Lok Sabha Election 2024 : एकीकडे मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) प्रत्येक मतदारसंघात 200 पेक्षा अधिक उमेदवार उभे करण्यासाठी बैठका सुरु असतानाच, आता माजी मंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी देखील अशीच काही भूमिका घेतली आहे. प्रत्येक मतदारसंघात 'मी खासदार' या अभियानाअंतर्गत 300 ते 400 उमेदवार उभे करणार असल्याच बच्चू कडू म्हणाले आहे. त्यांच्या या भूमिकेने निवडणूक आयोगाची (Election Commission) चिंता वाढण्याची शक्यता आहे.  


याबाबत बोलतांना बच्चू कडू म्हणाले की, "आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमची देखील तयारी झाली आहे. प्रत्येक मतदारसंघात 300 ते 400 उमेदवार उभे करायचे. त्यासाठी आमच्या काही बैठका देखील झाल्या आहे. 'मी खासदार' असे अभियान यासाठी राबवणार आहोत. कारण आमचं बॅलेट आम्हाला पाहायला मिळत नाही, आमचं मत आम्ही कुणाला मारलं, कुठे गेलं, ते कुणाला मिळालं, कुणाला नाही मिळालं याचा मूलभूत अधिकारच ईव्हीएम मशीनने हिनावून घेतला आहे. आमचा तो अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, घरकुल मिळत नाही, शहर आणि गाव अशी वेगळी तफावत आहे. हे सर्व मुद्दे घेऊन 'मी खासदार' असं अभियान राबवणार असल्याचे,” बच्चू कडू म्हणाले. 


भाजपला आमची गरज वाटत नसेल... 


महायुतीत छोट्या पक्षांना भाजप विचारत नाही. त्यांना गरज वाटत नसेल.  हा त्यांचा प्रश्न आहे की, ते का विचारत नाही. त्यामुळे आता आम्ही देखील तयारी केली आहे. प्रत्येक मतदारसंघातून 300 ते 400 उमेदवार उभे करणार आहोत. एकनाथ शिंदे शिंदे यांना देखील मी स्वतःहून विचारणार नाही. त्यांनी विचारलं तर मी सांगेल. महायुती आमच्यासमोर पर्याय आहे, महाविकास आघाडीबद्दलच्या जर तरच्या विषयात आम्ही जात नाही. सध्या इकडचं नातं तुटलं तरच समोर जाऊ, असे बच्चू कडू म्हणाले.


काय ते उघड करू 


सुरुवातीला दिल्लीत एक बैठक झाली. तर, आणखी एका बैठक झाली ज्यात मी गेलो नाही. मला असे वाटते की जेव्हा आपण एखादी निवडणूक लढतोय, त्यावेळी जसं आपण मतदारसंघात शेवटच्या माणसाला विचारतो, तशी भूमिका सध्या भाजपची दिसत नाही. आम्हाला देखील त्याची फार काही गरज वाटत नाही. तो त्यांचा विचार आहे, आम्ही आमच्या विचाराने चालणार आहोत. महाराष्ट्रात देखील अनेक एनडीएच्या बैठका झाल्या, त्यात आम्हाला बोलवलं नाही. काय ते उघड करू असं लपून-छपून करणार नाही, असे बच्चू कडू म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या वाराणसी मतदारसंघातून 1 हजार मराठा उमेदवार रिंगणात उतरणार