Maharashtra Politics अमरावती : राज्यातील महिलांसाठी महायुती सरकारने आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (CM Ladki Bahin Yojana) सध्या चांगलीच चर्चेत आहे. तर दुसरीकडे याच लाडकी बहीण योजनेवरुन विरोधकांनी सातत्याने सरकारवर टीका करत जोरदार हल्ला केला आहे. दरम्यान, आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक चर्चेवेळी लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर टीका करत निशाणा साधला आहे. येत्या जानेवारी महिन्यात पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत’ असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांना अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा” असं म्हणत राज ठाकरेंनी या योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. 


दरम्यान, राज ठाकरेंच्या या टीकेवर भाष्य करत प्रहारचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडूंनीही (Bacchu Kadu) राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. याविषयी भाष्य करताना बच्चू कडू म्हणाले की, राज ठाकरे म्हणाले त्या प्रमाणे वस्तुस्थिती काहीशी असू शकते, पण मुळात लाडकी बहीण योजनेमुळे ही अवस्था नाही. तर सरकारी अधिकारी, आमदार पगारामुळे ही अवस्था होईल. त्यामुळे राज ठाकरेंनी याचा अभ्यास केला असता तर चांगलं राहिल असत. असा खोचक सल्ला बच्चू कडूंनी राज ठाकरेंना देत टीका केली आहे. कलेक्टरवर 7 लाख रुपये खर्च होतो. तर आमदारावर साडे तीन लाख रुपये महिना खर्च होतोय. हे देखील लक्षात घेतलं पाहिजेल. असेही ते म्हणाले. 


सगळे पक्ष वाढले पाहीजे, दुकानदारी वाढली की उधारी घ्यायला बरं होतं 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या (VidhanSabha Election 2024) पार्श्वभूमीवर मनसे (MNS)पक्ष देखील मैदानात उतरला असून त्या अनुषंगाने राज्यभरात जोरदार तयारी करत आहे. मनसे आगामी विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) हे महाराष्ट्र दौरा करत आहेत. दरम्यान, त्यातीलच एक भाग म्हणून राज ठाकरे विधानसभेसाठी 'मिशन विदर्भ'साठी रणनीती आखत आहेत. 27 आणि 28 सप्टेंबर रोजी दोन दिवस राज ठाकरे अमरावती दौऱ्यावर आहेत.


यावेळी ते विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावरही बच्चू कडू यांनी टीका करत निशाणा साधला आहे. राज्यात सगळे पक्ष वाढले पाहीजे. कारण दुकानदारी वाढली की उधारी घ्यायला बरं होतं. गावात एकच दुकान राहिली तर मक्तेदारी वाढते. दहा दुकान झाली की दुकान चालते, जे चांगलं देईल त्याची दुकानदारी चालेल. अशा शब्दांत बच्चू कडू यांनी टीका केली आहे.


....तर काँग्रेसचं डिपॉझिट ही जप्त झाले असतं- बच्चू कडू 


यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी तिसऱ्या आघाडीवर केलेल्या टिकेलाही चोख प्रत्त्युत्तर दिले आहे. 
यावेळी ते म्हणाले की, त्यांच्यात आता दम राहिला नाही. त्यांना वाटत असेल की आम्ही उभं राहिल्याने तुमचं नुकसान होत असेल, तर तुमची कुवत काय, हे माहिती पडते. त्यामुळे त्यांची कुवत नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सत्ता आणू शकलं नाही, मुस्लिम आणि दलित मत मिळाली नसती तर  काँग्रेसचं डिपॉझिट ही जप्त झाले असतं. असेही बच्चू कडू म्हणाले. 


हे ही वाचा