सध्या आरोग्य व्यवस्थेत सर्वात महत्वाची गरज आहे ती कुशल मनुष्य बळाची, याकरिता शासनाकडून विविध उपायजोयना केल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे कोविड योद्धा उपक्रम! आरोग्यसेवेतील कर्मचारी कमी पडू नयेत या हेतूने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याला आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद देत योगदान करण्याचा निर्णय घेतला आहे. जेष्ठ समाजसेवक मुरलीधर देवीदास आमटे उर्फ बाबा आमटे याची नात शीतल आमटे-करजगी यांनी या मोहिमेत आपला सहभाग दाखवला असून शुक्रवारी त्या चंद्रपूर जिल्यातील वरोरा उपजिल्हा रुग्णालयात रुजू झाल्या आहेत.


शीतल आमटे- करजगी यांनी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. ही वैद्यकीय पदवी 2003 साली मिळवली असून त्यानंतर त्या पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. सध्या त्या आनंदवन येथील महारोगी सेवा समिती, वरोरा यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आमटे परिवाराची ही तिसरी पिढी सामाजिक क्षेत्रात काम करत असून डॉ. विकास आमटे आणि बाबा आमटे यांच्याकडून त्यांनी सामाजिक कार्याची प्रेरणा घेतली आहे. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी सामाजिक क्षेत्रातील केलेल्या कामामुळे देश-विदेशातील विविध संस्थांकडून त्यांना गौरवण्यात आलं आहे. त्यांना केंद्र सरकारतर्फे पद्म विभूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून रॅमन मॅगसेसे या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. बाबा आमटे यांच्या निधनानंतर त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढील पिढीने अविरतपणे सुरू ठेवला आहे.

"माझं वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी पूर्ण वेळ आरोग्याशी संंबंधित काम आनंदवनात महाआरोग्य समिती मार्फत करत होतेच. चीन येथे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर आम्ही सर्वजण ह्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होतोच, म्हणून सरकारने लॉकडाऊन जाहीर होण्याच्या काही दिवस अगोदरच आम्ही आनंदवनात लॉकडाऊन केला होता. अशा या काळात मी आणि आमच्या आरोग्य चळवळीतील कार्यकर्ते आम्ही सर्वजण या आजाराशी संबंधित जनजागृती करत होतो लोकांना प्रशिक्षित करत होतो. तसेच येथील बऱ्यापैकी भागात आदिवासी भाषा कळत असल्यामुळे शासनाच्या सर्व नियमांची माहिती आम्ही गोंडी आणि अन्य तत्सम भाषेत लोकांपर्यंत पोहचवत होतो. आमचा जिल्हा ऑरेंज झोनमध्ये येतो. या आजाराचे रुग्ण इथे कमी असले तरी ते वाढू नयेत याकरिता विशेष काळजी घेणे गरजेचे होते. त्याकरिता जेव्हा मला कोविड योद्धा उपक्रमाबाबत कळलं तेव्हा मी सहभागी होण्याचं ठरवलं. त्यानुसार त्याचं ऑनलाईन प्रशिक्षण घेऊन मी शुक्रवारी रुजू झाले." असे शीतल आमटे-करजगी यांनी सांगितलं.

त्या पुढे असंही म्हणाल्या की, "इथे मी थेट रूग्ण जरी बघत नसले तरी, या आजाराच्या शिक्षणाबाबतच साहित्य बनविणे, आशा वर्कर ते गावकरी यांच्यामधील कार्यकर्त्यांमार्फत दुवा तयार करणे या सर्वाचा प्रयत्न केला. मला स्वतःला काही आरोग्याबाबतीतील व्याधी आहे पण त्या बाजूला ठेवून आपण समाजासाठी काही तरी केलं पाहिजे म्हणून मी या उपक्रमात सहभागी झाले आहे. आम्ही एक दवंडी तयार केली आहे, ज्यामुळे लोकांमध्ये जनजागृती निर्माण होईल. आमचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत काम करणार आहे. तसेच आम्ही मोठ्या प्रमाणात शास्त्रीय पद्धतीने मास्क बनवले आहेत जे धुवून पुन्हा वापरता येणार आहेत आणि आम्ही लोकांपर्यत पोहचवत आहोत. आमचा जिल्हा ग्रीन झोन कसा करता येईल यावर आमचा भर राहणार आहे. त्याचप्रमाणे सर्व सामान्यांपर्यंत या आजारासंबंधातील माहिती अगदी सोप्या आणि साध्या भाषेत तयार करून ठेवली आहे."

काही दिवसांपूर्वीच, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लष्करातील आरोग्य विभागातून निवृत्त झालेले तसेच आरोग्य संबंधित प्रशिक्षण घेऊनही हॉस्पिटलमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे नोकरीपासून दूर राहिलेल्यांनी सध्याच्या संकटात पुढे येण्याची गरज आहे असे आवाहन केले होते. तसेच जे कुणी निवृत्त सैनिक आहेत ज्यांना आरोग्य सेवेचा अनुभव आहे, अनेक निवृत्त परिचारिका, वॉर्ड बॉय, वैद्यकीय सहाय्यकाच प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्ती ज्यांना सध्या काम मिळालेले नसेल अशा लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असेही आवाहन केले होते. त्याकरिता खास 'कोविड योद्धा' या नावाने राज्य सरकारने एक इमेल आयडी तयार करून माहिती पाठवण्याचं आवाहन केलं होतं.

कोविड योध्दा या उपक्रमाचं काम ज्यांच्या देखरेखी खाली होत आहे, ते मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव भूषण गगराणी याप्रकरणी माहिती देताना सांगतात की , “कोविड योद्धा उपक्रमात सहभागी होण्यासाठी 22 हजारांपेक्षा जास्त लोकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी तीन हजाराांपेक्षा अधिक लोक त्यांचं प्रशिक्षण पूर्ण करून राज्यातील विविध भागात काम करत आहेत. यामध्ये डॉक्टरांची संख्या कमी असली तरी अन्य सेवा देणाऱ्या बऱ्याच लोकांचा समावेश आहे."