Ashadhi Wari Toll Free : आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र टोलमाफी कागदावरच असल्याचा अनुभव अकोल्यातील वारकऱ्यांना आला आहे. अकोल्यातील काही वारकरी पंढरपूरला जात असताना बीड-उस्मानाबाद रोडवरील पारगावच्या आयआरबी कंपनीच्या टोल नाक्यावर वारकऱ्यांकडून टोल वसुली करण्यात आली. यावेळी वारकऱ्यांनी टोल मागणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबाईल कॅमेऱ्यात कैद केले.  त्यामुळे वारकऱ्यांना देण्यात आलेली टोलमाफी कागदावरच आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. 


काय म्हणाले होते मुख्यमंत्री शिंदे 
कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते की, पंढरपूरसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांचा  आज आढावा घेतली.  सर्व अधिकारी , पोलीस, पंढरपूर मंदिर समिती यांच्या सोबत आढावा घेतला आहे. यंदाच्या एकादशीचे अतिशय चांगले नियोजन केलेले आहे. कोरोनामुळे दोन वर्षे खंड पडल्यामुळे यावर्षी वारकऱ्यांच्या  संख्येत वाढ होणार आहे याचा विचार करून नियोजन केलेले आहे. व्हीआयपी व्यक्तीपेक्षा वारकरी महत्त्वाचे आहे, त्यांचे संरक्षण केले पाहिजे.  वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण काळजी घेण्यात आली आहे. एसटीने चार हजार बस सोडल्या आहेत. गरज पड्यास अधिक बस सोडण्यास एसटी महामंडळाला सांगितले आहे.


10 जुलैला आषाढी एकादशी


अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून असलेला आषाढी वारी सोहळा दोन वर्षानंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरकडे रवाना झाल्या आहेत. पायी प्रवास पूर्ण करुन पालख्या 9 जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचणार आहेत. तर 10 जुलैला आषाढी एकादशी आहे. आता सर्व पालख्या पंढरपूरच्या जवळपास पोहोचल्या आहेत. अनेक वारकरी थेट एकादशीदिवशी पंढरपुरात पोहोचतात.