Ashadhi Wari Latest news: ग्यानबा तुकारामच्या गजरात राज्यभरातील प्रमुख पालख्या पंढरपूरच्या ( Pandharpur Wari) दिशेने चालल्या आहेत. त्यामध्ये आज नामदेव महाराजांच्या पालखीने नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. तर मनमाडहून कैकाडी महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान सुरू झालं आहे. 


निवृत्ती महाराजांची पालखी गोगलगावमध्ये तर मुक्ताबाईंची पालखी देऊळगाव राजामध्ये 


संत निवृत्तीनाथांची पालखीने (Sant Nivruttinath Palkhi) नगर जिल्ह्यात प्रवेश केला असून कालच्या पारेगाव मुक्कामानंतर दिंडीने गोगलगावकडे प्रस्थान केले आहे. तर गुरुवारी देऊळगाव मही इथे मुक्कामी असलेली मुक्ताबाईंची पालखीचं आज देऊळगाव राजाकडे प्रस्थान झाले आहे. 


संत मुक्ताबाईंसह (Sant Muktabai) संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा सातवा दिवस आहे. दातलीच्या रिंगणानंतर संत निवृत्तीनाथांची पालखी खंबाळे येथे मुक्कामी होती. त्यानंतर पालखी खंबाळेहून निघून पुढे पारेगावला विसावली होती. आज पारेगावहून संत निवृत्तीनाथांची पालखी पुढे मार्गस्थ झाली आहे. याबरोबर दिंडीने अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला आहे. आज पारेगावहून निघून पुढे संगनमनेर तालुक्यातील काकडवाडी मार्गे गोगलगावकडे मुक्कामी प्रस्थान करणार आहे. 


नामदेव महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 


संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. नामदेव महाराज यांचं जन्मगाव आसलेल्या नरसी नामदेव येथून पालखी पंढरपूरकडे निघाली आहे. पुढील 21 दिवसांचा प्रवास करून पालखी पंढरपुरात पोहोचणार आहे. पालखीचे हे 28 वे वर्ष आहे. या प्रवासादरम्यान पालखीचे 4 रिंगण सोहळे होणार आहेत. त्यातील पाहिला रिंगण सोहळा आज हिंगोलीत पार पडला.


मनमाडहून कैकाडी महाराजांच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान


ज्ञानोबा माउली... तुकाराम, हरी नामाचा जयघोष, टाळमृदंगाच्या गजरात खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशीवृंदावन घेतलेले वारकरी हातात टाळ आणि मुखात अभंग, श्री संत कैकाडी महाराज आणि श्रीसंत कोंडीराम काका यांच्या मूर्ती, पादुका असलेला बैल जोडीचा रथ आणि त्यापुढे मानाचा अश्व अशा भक्तिमय वातावरणात कैकाडी महाराजांची दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली. दिंडीचे यंदाचे हे 43 वे वर्ष आहे. मनमाड शहरातून अखंडित परंपरा असलेल्या आणि श्री क्षेत्र पंढरपूरच्या पवित्र भूमीत नाशिकच्या मनमाड शहराची पताका फडकावणाऱ्या महान तपस्वी श्री. संत कैकाडी महाराज आणि श्री. संत कोंडीराम काका यांनी सुरु केलेल्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले. रामदास महाराज यांच्या नेतृत्वाखाली  नित्यनेमाने शिवाजी नगर येथील महादेव मंदिराच्या प्रांगणातून कीर्तन प्रवचन झाल्यानंतर सजवलेल्या आणि मानाची बैलजोड असलेला रथ घेवून दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले.


सायकल वारी पंढरपूरकडे 


सायकल वारीने नाशिकहून पंढरपूरकडे आज पहाटे 6 वाजता प्रस्थान केले असून यंदाचे त्यांचे हे अकरावे वर्ष आहे. गोविंदनगर परिसरात जवळपास दोनशे सायकलिस्ट एकत्र आले त्यानंतर ढोल ताशाच्या तालावर हरिनामाचा जयघोष करण्यात येऊन वारीला सुरुवात झाली. यंदा विठ्ठलाचा पालखी रथही तयार करण्यात आला असून या वारीतून सायकलचे महत्व पटवून देण्यासोबतच पर्यावरण रक्षणाचाही संदेश देण्यात येतो आहे, 200 झाडे सोबत घेऊन पंढरपूरला ते वृक्षारोपण करणार आहेत. पहिल्याच दिवशी पावणे दोनशे किलोमीटर अंतर पार केल्यानंतर अहमदनगरला पहिला मुक्काम असणार आहे. 10 जूनला पंढरपूरला नाशिकसह राज्यभरातून जवळपास 4 हजार सायकलिस्ट एकत्र येणार असून 11 जूनला सकाळी प्रभात फेरी काढली जाईल आणि त्यानंतर विठूरायाचे दर्शन घेऊन रात्री सायकलिस्ट माघारी फिरतील. 


आषाढी वारीसाठी दरवर्षी महाराष्ट्रातून (Maharashtra) प्रमुख 43 पालख्या पंढरपुरात (Pandhapur) दाखल होतात. या पालख्यांमध्ये तुकोबारायांची पालखी, माऊलींची पालखी, गजानन महाराजांची पालखी, सोपानकाकांची पालखी, मुक्ताईंची पालखी या पालख्या आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरतात.