Pandharpur : आषाढी यात्रेसाठी (Ashadhi Wari 2022)  गेल्या 18 दिवसांपासून अहोरात्र दर्शनासाठी उभ्या असलेल्या विठुरायाच्या प्रक्षाळ पूजेस आज सकाळी सुरुवात झाली. परंपरेनुसार आषाढीला देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना दर्शन देण्यासाठी देवाचा पलंग काढून मंदिर चोवीस तास दर्शनासाठी उघडे ठेवण्यात येत असते. या दरम्यान देवावरील सर्व राजोपचार बंद करून चोवीस तास दर्शन सुरु असते. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे आषाढी वारीत खंड पडला होता. मात्र, यावर्षी आषाढीला भाविकांनी खूप गर्दी केली होती. 


दरवर्षीच्या परंपरेनुसार, 1 जुलै रोजी देवाचा पलंग काढून देव चोवीस तास दर्शनासाठी उभा होता. आज तब्बल 18 दिवसानंतर 18 जुलै रोजी पुन्हा देवाचा पलंग बसविण्यात आला. या दरम्यान देवाच्या प्रक्षाळ पूजेस सकाळपासून सुरुवात झाली. यावेळी देवाचा थकवटा घालवण्यासाठी देवाच्या अंगाला लिंबू आणि साखर चोळून गरम पाण्याने स्नान घातले गेले. याचसोबत देवाच्या अंगावर पांढरे वस्त्र टाकून त्यावरून देवाला गरम पाण्याचे मंत्रोपचारात स्नान घालण्यात आले. यानंतर देवाची महापूजा करताना देवाला दूध, गंधासह पंचामृत आणि केशर पाण्याने अभिषेक करण्यात आला. यानंतर विठ्ठल रुक्मिणी चौखांबी, सोळखांबी येथे सुगंधी फुलांनी सजवून देवाला पारंपरिक दागिन्याने मढविण्यात आले.


आज तब्बल 18 दिवसानंतर विठ्ठल रुक्मिणीला निद्रा मिळणार असल्याने रात्री 17 प्रकारच्या आयुर्वेदिक वनस्पतींचा काढाही देवाला दाखविला जाणार आहे. या दरम्यान आषाढीच्या प्रमुख तीन दिवसांत जवळपास 5 लाख भाविकांनी देवाच्या पायावर आणि मुखदर्शनाचा आनंद घेतला. कोरोना काळानंतर तब्बल दोन वर्षांनी आषाढीचा सोहळा साजरा करण्यात आला. यामुळे यावर्षी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रभरातून तब्बल 90 हजार भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. 


महत्वाच्या बातम्या :