Kolhapur Rain update : कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील घाट विभागात तसेच नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात (catchment areas) रविवारी पाऊस कमी झाल्याने कृष्णा (Krishna river) आणि पंचगंगा नद्यांच्या (Panchaganga river) पाणीपातळीत घट झाली आहे.


पंचगंगा नदीची पाणीपातळी आज दुपारी 12 वाजेपर्यंत 36 फुट 5 इंचावर आहे. जिल्ह्यातील 48 बंधारे अजूनही पाण्याखाली आहेत. मात्र, सध्या कोणताही मोठा रस्ता पाण्याखाली गेलेला नाही. दरम्यान, सांगली शहरातील आयर्विन पुलावर रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास कृष्णा नदी 19 फुटांवरून वाहत होती. तसेच कोयना धरणातील पाणीसाठ्याने ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी सायंकाळी 6 वाजता संपलेल्या 24 तासांच्या कालावधीत धरणात 2.8 टीएमसी पाण्याची भर पडली. रविवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत कोयना आणि नवजा येथे 18 मिमी, तर महाबळेश्वरमध्ये 40 मिमी पाऊस झाला.


कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग 2100 क्युसेक होता, तो गेल्या दोन दिवसांपासून कायम होता. पाण्याच्या विसर्गासाठी धरणाचे एकही गेट अद्याप उघडलेले नाही. सध्या धरणाच्या पॉवर हाऊस स्पिलवेमधून विसर्ग सुरू आहे. दरम्यान, अलमट्टी धरणातून विसर्ग दीड लाख क्युसेक सुरु आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी कमी होण्यास मदत झाली आहे. 


धरणे 50 टक्क्यांहून अधिक भरली असल्याने विसर्ग सुरूच राहणार असल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पूर येण्याचा कोणताही धोका नाही, मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे. “आम्ही धरणांमध्ये काही जागा तयार करू जेणेकरून अचानक पाऊस पडल्यास पूरस्थिती टाळता येईल. 15 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहील. पावसाळ्याच्या अखेरीस धरणे पुन्हा भरली जातील याची खात्री करून आम्ही उर्वरित वर्षाची मागणी पूर्ण करू, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.


इतर महत्त्वाच्या बातम्या