यवतमाळ : यवतमाळमधील 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निषेधाचे सत्र दुसऱ्या दिवशीही सुरुच आहे. आज दुसऱ्या दिवशी कलाकारांनी काळ्या फिती लावत सहगल प्रकरणाचा निषेध केला आहे. नयनतारा सहगल यांच निमंत्रण रद्द केल्या प्रकरणी पहिल्या दिवशी अध्यक्ष अरुणा ढेरे आणि मावळते अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघाती टीका केली होती.


संमेलनात आज ग.दी.माडगुळकरांच्या साहित्य संपदेचा आढावा घेणाऱ्या संगीतमय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अक्षय वाटवे, गौरी देशपांडे , अपर्णा केळकर, डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी सहभागी झाल्या होत्या. या चारही सहभागी कलाकारांनी काळ्या फिती लावत सहगल प्रकरणाचा निषेध केला.

काळ्या फिती लावून गदिमांच्या कवितांचं या कलाकारांनी वाचन केलं. यासोबतच याप्रकरणी मुंबईच्या 'मुक्त शब्द मासिक' आणि 'शब्द प्रकाशना'नं निषेध आणि बहिष्काराचे फलक 73 क्रमांकाच्या स्टॉलमध्ये लावले आहे.

काय आहे वाद?
या संमेलनाला उद्घाटक म्हणून इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना आयोजन समितीकडून आमंत्रण देण्यात आले होते. मात्र त्यांच्या नावाला काही संघटनांकडून विरोध करण्यात आला होता. मराठी साहित्य संमेलनामध्ये इंग्रजी लेखिका कशा, असे म्हणून संमेलन उधळून लावू अशी भाषा केली होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांच्या सांगण्यावरून यवतमाळ आयोजन समितीने नयनतारा सहगल यांना पाठविलेले निमंत्रण रद्द केले होते. त्यानंतर सर्व साहित्य क्षेत्रातील व्यक्ती आणि विविध स्तरातून निमंत्रण रद्द केल्याबद्दल टीका करण्याात आली होती. आता त्यानंतर या संमेलनाच्या नव्या उद्घाटकाचे नाव सुचविण्यात यावे, असे महामंडळाने आयोजन समितीला सांगितले होते. यवतमाळ आयोजन समितीने काल साहित्य महामंडळाला उद्घाटक म्हणून चार व्यक्तींची नावं सुचवली होती.

सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह : संमेलनाध्यक्षा अरूणा ढेरे
नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करणे अत्यंत निषेधार्ह आहे. सहगल या आगळ्यावेगळ्या लेखिका असून सहगल यांचे विचार जोपासायला हवेत, अशा तिखट शब्दात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी समाचार घेतला होता. साहित्याशी किंवा भाषेच्या समृद्धतेशी ज्यांचा काडीचाही संबंध नाही, अशा लोकांमुळे वाद निर्माण होतो ते चुकीचे आहे, असे परखड मत ढेरे यांनी व्यक्त केले होते.

आपण झुंडशाहीला बळी पडलो : लक्ष्मीकांत देशमुखांचे घणाघात
नयनतारा सहगल यांचे आमंत्रण मागे घेणे हे अनुचित आहे. आपण झुंडशाहीला बळी पडलो आहोत. सहगल आल्या असत्या आणि भाषण केलं असत तर काही राजकीय आभाळ कोसळलं नसतं, अशा शब्दात माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघात केला होता. नयनतारा सहगल यांचा साहित्य कर्तृत्वाला सलाम करतो आणि भाषणाला सुरूवात करतो, अशा शब्दात त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली होती.