मुंबई : अभिनेत्री कंगना रानौतच्या अडचणी काही कमी होत नाहीत. आधीच मानहानीचे खटले कमी होते की काय, म्हणून आता गीतकार जावेद अख्तर यांनीही कंगनाच्या विरोधात अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आपला चौकशीचा प्राथमिक अहवाल कोर्टात सादर केला. मात्र कंगनाचा यासंदर्भात जबाब नोंदवणं अद्याप बाकी असल्याचं पोलिसांच्यावतीनं कोर्टाला सांगण्यात आलं. तेव्हा कोर्टानं कंगनाला समन्स जारी करत या प्रकरणाची सुनावणी 1 मार्चपर्यंत तहकूब केली.


अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये जावेद यांचाही उल्लेख केला होता. यामध्ये तिने एका बॉलिवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद अख्तर यांच्याबाबत काही वादग्रस्त विधाने केली आहेत. या व्हिडिओला यू ट्यूबवर लाखो हिटस मिळाल्या आहेत. मात्र, "या संवेदनशील प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना माझ्यावर धादांत खोटे आणि आधारहीन आरोप कंगनाने केले आहेत. यामुळे माझी विनाकारण मानहानी झाली असून मला नाहक प्रचंड मनस्ताप झाला आहे, त्यामुळे कंगनावर फौजदारी खटला चालवावा", अशी मागणी जावेद अख्तर यांनी या दाव्यामध्ये केली आहे. आयपीसी कलम 499 आणि 500 नुसार अब्रुनुकसानी केल्याचा खटलाही दाखल करण्याची मागणी जावेद अख्तर यांनी कोर्टाकडे केली आहे.


कंगनाने बॉलीवूडमध्ये माफिया राज असल्याचा आरोप सोशल मीडियावर आणि रिपब्लिकच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये केला आहे. दिग्दर्शक महेश भट आणि अख्तर यांचा यामध्ये थेट उल्लेख केलेला होता. सोशल मीडियावर या व्हिडीओला लाखो हिट्स मिळाले आहेत.


संबंधित बातम्या

Kangana Ranaut : कंगना रनौत दिसणार इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत!

कोर्टाला हमी देऊनही कंगनाकडून सोशल मीडियाचा वापर, तक्रारदारांच्यावतीनं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र