मुंबई : एका विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह ट्वrट केल्याप्रकरणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अभिनेत्री कंगना रनौतनं हायकोर्टाला सोशल मीडियाचा चुकीचा वापर करणार नाही, अशी हमी देऊनही सर्रासपणे याचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत याप्रकरणी तक्रारदारांच्यावतीनं सोमवारी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. दरम्यान यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी अवधी देत हायकोर्टानं कंगनाला वेळ देत 15 फेब्रुवारीपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.


मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना हिची बहीण रंगोलीनं एका विशिष्ट समाजाबद्दल द्वेषयुक्त व अपमानकारक ट्वीट केलं होतं. तर आपल्या बहिणीला पाठिंबा दर्शवत कंगनानं एक व्हिडीओ ट्विटरवर अपलोड केला होता. याप्रकरणी बॉलिवूडमधील कास्टिंग डायरेक्टर मुनावर अली सय्यद यांच्या तक्रारीवरून वांद्रे दंडाधिकारी कोर्टाने मुंबई पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा यासाठी कंगना व तिची बहीण रंगोली चंदेल यांच्यावतीनं हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सोमवारी न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.


तक्रारदार मुनावर अली सय्यद यांनी अॅड रिझवान सिद्दीकी यांच्यामार्फत हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केल असून त्यात असा आरोप केला आहे की, कंगनानं केवळ दोन समाजात तेढ नाही तर आपल्या ट्विटने सामाजिक सलोखा बिघडवण्याचंही काम केलं आहे. तसेच महाराष्ट्र सरकार प्रति अनादरही व्यक्त केला आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली हिच्या विरोधात कलम 124 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्याचे दिलेले आदेश योग्यच आहेत. हायकोर्टाने या प्रतिज्ञापत्रावर सविस्तर युक्तिवाद करण्याचे प्रतिवाद्यांना आदेश देत सुनावणी 15 फेब्रुवारी पर्यंत तहकूब केली, मात्र तोपर्यंत कंगनाला दिलेला दिलासा कायम ठेवला आहे.