Amravati Corona news कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि नागरिकांचा बेजबाबरपणा यामुळं ओढावलेलं संकट पाहता अखेर अमरावतीमध्ये पुढील आठवड्याभरासाठी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्याच्या पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. रविवारी पार पडलेल्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.


शनिवारी अमरावतीमध्ये 1 हजारहून धिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि सर्वांनाच धडकी भरली. कोरोना नेमका किती वेगानं फैलावत आहे, याचा स्पष्ट अंदाज हे आकडे पाहून आला. परिणामी सुरुवातीला फक्त काही तासांपुरताच सीमित ठेवण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय थेट पुढील आठवड्याभरापर्यंत कायम ठेवण्यात आला. प्रशासनाच्या या निर्णयाअंतर्गत काही नवे निर्देशही देण्यात आले.


Corona Virus Update: राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक! कोणत्या शहरात काय निर्बंध?


विभागातील पाच जिल्ह्यांच्या (अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम) दृष्टीनं कोविड 19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी सुधारित निर्देश लागू करण्यात आले आहेत.




  • सर्व प्रकारची दुकाने/ आस्थापने ही सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील.

  • सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहील.

  • लग्नसमारंभकरिता 25 व्यक्तींना वधू-वरासह परवानगी राहील.

  • जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी श्रमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीकरिता परवानगी राहील

  • धार्मिक स्थळं ही एका वेळी दहा व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील.

  • संपूर्ण अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील.

  • अमरावती विभागातील ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे संबंधित ठिकाणेही बंद राहतील


सध्याच्या घडीला आयुक्तांनी असे निर्देश दिले असले तरीही, यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारीही निर्णयांमध्ये काही फेरबदल करतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तूर्तास, मात्र नागरिकांनी सर्वच नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.