अमरावती : अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना प्राध्यापकांनी प्रेमविवाह करणार नसल्याची शपथ 13 फेब्रुवारी रोजी देण्यात आली होती. या प्रकरणी तीन जण निलंबित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीचं कॉलेज बाहेर गेटवर आंदोलन सुरु करण्यातं आलं आहे. या तिघांचं निलंबन मागे घ्या अशी ठाम भूमिका विद्यार्थीनींनी घेतली आहे.
प्रेमविवाह न करण्याची शपथ प्रकरणी प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. प्रदीप दंदे आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी विजय कापसे यांना निलंबीत करण्यात आले आहे. विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने प्राचार्यांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. मात्र या प्रकरणाची चौकशी समितीमार्फत चौकशी होण्याआधीच यांना निलंबीत करण्यात आलं आहे.


या कारवाईनंतर विद्यार्थीनींनी महाविद्यालयाला कुलुप लावुन बाहेर आंदोलनाचा सुरूवात केली आहे. तीन प्राध्यापकांचे निलंबन जोपर्यंत मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत महाविद्यालयातील सर्व तासिकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. उद्यापासून कॉलेजला टाळा ठोकणार असल्याचा आक्रमक पवित्रा विद्यार्थिनींनी घेतला आहे. त्यामुळे आता महाविद्यालय तसेच संस्थेतर्फे कोणती भुमिका घेतल्या जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काय आहे ही प्रेमविवाह न करण्याची शपथ?

‘व्हॅलेंटाईन डे’ मात्र याच दिवसाचं औचित्य साधून एका महाविद्यालयाने महिला कला वाणिज्य महाविद्यालयातील मुलींना एक शपथ देण्यात आली होती. ‘ना प्रेम करणार ना प्रेमविवाह’ तसंच हुंडा न देता लग्न करण्याचा निश्चयही यावेळी मुलींनी केला होता. सध्या तरुण वयातच मुलांमध्ये आणि मुलींमध्ये प्रेम प्रकरणांचं प्रमाण वाढलं आहे. तसेच हुंडा घेण्याची पद्धत वाढली आहे. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन ही शपथ देण्यात आली. अमरावती जिल्ह्यातील चांदूर या ठिकाणी असलेल्या महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी हा निर्धार केला.