उस्मानाबाद : खंडोबा, ज्योतिबा अशा लोकदेवतांच्या यात्रा काळात आणि वेळा अमावस्येला आपल्याकडं ताकापासून अंबिल हे पेय बनवलं जातं. या अंबिलामुळे डिप्रेशनची पातळी कमी होते. स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात असं संशोधन बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड विद्यापीठानं केलं आहे.


आंबिल आरोग्यासाठी लाभदायक असल्याचं संशोधनात समोर आल्यानंतर अमुल आणि सयाजीराव गायकवाड विद्यापीठानं एकत्रितरित्या विक्री सुरु करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे अनेकांच्या ताटामध्ये हे आंबिल दिसणार आहे.


अंबिलामुळे डिप्रेशनची पातळी कमी होते. ताणतणावात जगणाऱ्यांचा तणाव कमी होतो. 'टाईम्स आँफ इंडिया'च्या वृत्तानुसार सयाजीराव गायकवाड विद्यापीठातील फुडस आणि न्युट्रिशन विभागानं तीन वर्षे 290 लोकांवर याबाबत संशोधन केलं. या संशोधनातून हे निष्कर्ष निघाले आहेत. कोट्रीसॉल नावाच्या घटक स्ट्रेस हार्मोन म्हणून ओळखले जातो. मात्र आंबिलमुळे 30 दिवसात कोट्रीसॉलमध्ये 4.2 टक्क्यांनी घट झाली. त्यामुळे डिप्रेशनची तणावाची पातळी वेगाने घटली.


महाराष्ट्रात अंबिल म्हणून प्रसिद्ध असलेलं हे पेय गुजरात, कर्नाटक, राजस्थान आणि उत्तर प्रेदशात 'रबडी छास' म्हणून प्रसिद्ध आहे. अंबिलाला 'शेतकऱ्यांच सूप'ही म्हणतात. बडोदा विद्यापीठाबरोबर मिळून अमुलनं तयार अंबिल अधिक काळ टिकेल असं तंत्र विकसीत केलं आहे. अमुलद्वारे अंबिलाची छोटी छोटी पाकीटं बनवून विकण्यात येणार आहेत.


आंबिल कसं बनवायचं?


साहित्य - दोन चमचे नाचणी किंवा ज्वारीचे पीठ, पाव कप आंबट ताक, तीन कप पाणी, चवीप्रमाणे मीठ, दोन चमचे बारीक कापलेला कांदा, एक लहान पाकळी लसुन


कृती - आंबट ताकात नाचणीचे किंवा ज्वारीचे पीठ रात्रभर भिजवावे. सकाळी उठून 3 कप पाणी गरम करायला ठेवावे. त्यात साधारण आवश्यकतेनुसार मीठ घालावे. साधारण उकळीला येईल असे वाटले की गॅस बारीक करून ताकात भिजवलेली नाचणी त्यात घालावी. गुठळ्या होऊ न देता ती नीट मिसळून चमच्याने ते मिश्रण हलवत राहावे. उतू जाण्याची शक्यता असल्याने गॅस मोठा करू नये. एक उकळी आली की गॅस बंद करुन आंबिल थंड करायला ठेवावे. प्यायला देताना त्यात आवडीप्रमाणे कच्चा कांदा, बारीक केलेला लसून आणि आंबट ताक घालून द्यावे.