Akola Amol Mitkari vs MNS :  उपमुख्यमंत्री  अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि मनसे यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. या संपूर्ण प्रकराला अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंसह अकोला पोलिसांना जबाबदार धारत गंभीर आरोप केले आहे. मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप अमोल मिटकरींनी केला आहे. मनसे सरचिटणीस कर्णबाळा दुनबाळे (Karnabala Dunbale) हे पोलिसांचा लाडका भाऊ आहे का? त्याच्याविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरून उठणार नाही. असे म्हणत मिटकरींनी काल आक्रमक पवित्रा घेतला होता. एकंदरीत या प्रकरणात आता अकोला पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी मनसे सरचिटणीस कर्णबाळा दूनबळेंच्या अटकेसाठी अकोला पोलिसांचे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.


मनसे सरचिटणीसांच्या अटकेसाठी  तीन पथकं मुंबईच्या दिशेने रवाना 


अकोला सिव्हिल लाईन पोलिसांचं पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती हाती आली आहे. मात्र मनसे नेते कर्णबाळा हे सध्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याचेही बोललं जातंय. मनसे सरचिटणी सदुनबळे यांच्या अटकेसाठी एकूण तीन पथकं नेमण्यात आली आहे. दुनबळेंच्या अटकेसाठी काल आमदार अमोल मिटकरींनी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन करत कडक कारवाईची मागणी केली होती. सोबतच अकोला पोलीस मनसे पक्षाच्या लोकांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही केला होता. त्यामुळे आता पोलिसांनीही पुढची कारवाई करण्याचा पवित्रा घेतल्याचे चित्र आहे. मात्र या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.


काय म्हणाले अमोल मिटकरी? 


राज ठाकरेंच्या मनसे पक्षाच्या खुनशी लोकांना अकोला पोलीस पाठीशी घालत आहेत. अकोला पोलीस दलातील अधिकारी मनसेच्या (MNS) कर्णबाळा दुनबाळे यांची हॉटेलमध्ये गळाभेट घेतात. त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. यावरुन मनसेचे गुंड कोणाच्या जीवावर उडत आहेत, हे दिसून येते. माझ्यावर मनसेच्या गुंडांनी हल्ला केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझी फोनवरुन विचारपूस केली. एवढेच नव्हे तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मला फोन केला होता. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मला फोन करावासा वाटला नाही. माझा जीव गेल्यावर ते शांत होणार आहेत का, असा सवाल अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपस्थित केला. ते गुरुवारी अकोल्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


राज ठाकरेंच्या पक्षासारखे खुनशी लोक महाराष्ट्रात सत्तेवर बसवले तर काही खरं नाही. कर्णबाळा दुनबाळे हा पोलिसांचा लाडका भाऊ आहे का? त्याच्याविरोधात ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत मी पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेरून उठणार नाही. पोलिसांनी त्यांच्या रिव्हॉल्व्हरमधून माझ्या डोक्यात सहाच्या सहा गोळ्या घालाव्यात. गुंडांकडून मरण्यापेक्षा पोलिसांच्या हातून मेलेलं केव्हाही चांगलं आहे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले. 


हे ही वाचा