Akola Lok Sabha constituency : अठराव्या लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या रणधुमाळीची सांगता झालीय. विदर्भ आणि मराठवाड्यातील आठ मतदारसंघातील मतदारांचा कौल मतपेटी बंद झाला आहे.  तर अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य आता 4 जूनला ठरणार आहे. अशातच काही ठिकाणी मतदानाच्या टक्केवारी वाढल्याचे चित्र आहे. तर काही ठिकाणी मतदार याद्यातील घोळ, मतदानाची उदासीनता आणि उष्णतेची लाट इत्यादी कारणांमुळे काही ठिकाणी मतदान अपेक्षेप्रमाणे झालेले नाही. असे असताना, अकोल्यात (Akola) मात्र काही अंशी मंतदानाची टक्केवारी वाढल्याचे बघायला मिळाले आहे. तर या मतदारसंघात तिरंगी लढत असताना याचा फायदा आपल्यालाच होईल, असा विश्वास या मतदारसंघातील प्रत्येक उमेदवारांनी बोलून दाखवला आहे.      

अकोल्यात मतदानाची टक्केवारी वाढली    

अकोला लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाचा टक्का दोन टक्क्यांनी वाढलाय. 2019 मध्ये अकोल्यात 59. 76 टक्के मतदान झालं होतं. तर काल झालेल्या मतदानात अकोल्याचा टक्का हा 61.79 टक्क्यांवर गेला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 90 हजार 814 मतदार आहेत. त्यापैकी 11 लाख 68 हजार 348 मतदारांनी प्रत्यक्षात मतदान केले आहे. अकोला लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने निष्णात ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे वंचितकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना उमेदवारी देण्यात आली असल्याने अकोला लोकसभेत तिरंगी लढत होणार आहे. त्यामुळे या वाढत्या टक्केवारीचा फायदा नेमका कुणाला होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  

तिरंगी लढतीत नेमका कौल कुणाला?

दरम्यान, या वाढलेल्या मतदानाचा फायदा हा आपल्यालाच होणार असल्याचा दावा काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांनी केलाय. लोकांमध्ये असलेला रोष मतदानातून व्यक्त होत आहे. म्हणूनच ही आकडेवारी वाढल्याचे डॉ. अभय पाटील म्हणालेत. तर आपण एक लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ, असा, विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. दरम्यान, निवडणुकीच्या काळात काही लोकांकडून आपल्याला धमक्या दिल्याचा गंभीर आरोपही डॉ. पाटील यांनी केलाय. निवडणुकीच्या काळात आपल्यावर विविध माध्यमातून दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. मात्र ही निवडणूक सर्वसामान्य नागरिकांनी हाती घेतली आहे. बहुतांश ठिकाणी उस्फूर्त प्रतिसाद मतदानाला मिळाले आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील राग आणि चीड मतदानातून व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे देशात परिवर्तन नक्की होईल, असा विश्वासही डॉ. अभय पाटील यांनी बोलताना व्यक्त केलाय.

 

मतदारसंघ एकुण मतदान झालेलं मतदान टक्केवारी
अकोट   300362  192283 64.02%
बाळापूर  300662 200170  68.58%
अकोला (पश्चिम) 332763  182599  54.87%
अकोला (पूर्व) 340802  202294   59.36%
मुर्तिजापूर  300296 193761   64.52%
रिसोड  315929 197241 62.43
एकूण   1890814   1168348  61.79%

महत्वाच्या इतर बातम्या