पुणे : राज्यातील दूध उत्पादकांचं आंदोलन आता चिघळण्याची शक्यता आहे. सरकारने 9 मेपर्यंत ठरल्याप्रमाणे प्रतिलिटर 27 रुपये भाव न दिल्यास मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य किसान सभेने दिला आहे.


यासाठी राज्यभर दौरा करुन शेतकऱ्यांना संघटित केलं जाणार आहे. आणि त्यानंतर लाँग मार्चही काढण्यात येईल, असं महाराष्ट्र राज्य किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी म्हटलं आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

गाईच्या दुधाला प्रतिलिटर 27 रुपये दर सरकारने जाहीर केला आहे. मात्र दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून 17 किंवा 18 रुपये प्रति लिटर दराने दूध विकत घेतलं जातं. एक लिटर दुधाचा उत्पादन खर्च 37 रुपये आहे. पण सरकारने स्वत:च ठरवल्याप्रमाणे  किमान 27 रुपये प्रति लिटर भाव तरी द्यावा, अशी मागणीही अजित नवलेंनी केली आहे.

या दूध दरवाढीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील लाखगंगा गावाने ग्रामपंचायतीमध्ये ठराव करुन विकत नाही तर फुकट दूध न्या अशाप्रकारच आंदोलन 3 मेपासून सुरु केलं आहे. दूध उत्पादन करणाऱ्या 9 जिल्ह्यातील शेतकरीही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

9 मे पर्यंत सरकारने ठरल्याप्रमाणे 27 रुपये भाव दूध उत्पादक शेतकऱ्यांना न दिल्यास दूध उत्पादक शेतकरी मंत्रालयाला घेराव घालतील. तसंच 9 मे नंतर दूध उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांचा दौरा करून शेतकऱ्यांना संघटित केलं जाईल आणि लॉन्ग मार्चच्या माध्यमातून मोर्चासाठी प्रयत्न केले जातील, असंही अजित नवलेंनी स्पष्ट केलं आहे.