अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना उपचारासाठी अहमदनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी अण्णांच्या काही तपासण्या केल्या असता त्यांच्या डोक्यात रक्ताची गाठ असल्याचं समोर आलं.


केंद्रात लोकपाल आणि राज्यांमध्ये लोकायुक्ताच्या नियुक्तीसाठी राळेगणसिद्धीमधील सात दिवसांच्या उपोषणानंतर अण्णांना अशक्तपण जाणवत होता. त्यांची तब्येतही बरी नव्हती. रात्री अचानक अण्णांच्या डाव्या हाताला मुंग्या येत असल्यामुळे त्यांना अहमदनगरच्या नोबेल रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या तपासण्या केल्या. अण्णा हजारेंचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असले तरी त्यांच्या डोक्यात रक्ताची गाठ असल्याचं डॉक्टरांना जाणवलं. त्यामळे डॉक्टरांनी त्यांना 24 तास रुग्णालयात आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

अण्णा हजारे एवढे अशक्त झाले आहेत की, त्यांना पायी चालताही येत नव्हतं. त्यांना व्हीलचेअरच्या मदतीने अॅम्ब्युलन्सपर्यंत नेण्यात आलं. उपचारांनंतर अण्णांची प्रकृती सुधारत असून त्यांना आज (15 फेब्रुवारी) डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

5 फेब्रुवारीला सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर अण्णा हजारेंनी आपलं सात दिवसांचं उपोषण सोडलं. यानंतर ते फारच अशक्त झाले होते.