चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या सासू-सासऱ्यांली लिहिलेल्या एका फेसबुक पोस्टमुळे खळबळ उडाली आहे. निराशेत असलेल्या मुलीला आमटे कुटुंबाने एकटे सोडल्याचा आरोप करतानाच शीतल आमटे यांच्या सासू-सासऱ्यांनी फेसबुकच्या माध्यमातून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आमटे कुटुंबाने मुला-मुलीत भेद केल्याचा दावा देखील या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आला आहे. सध्या ही पोस्ट डिलिट करण्यात आली आहे. मात्र शीतल यांचे पती गौतम करजगी यांनी अशी पोस्ट सुहासिनी आणि शिरीष करजगी यांनी लिहिली असल्याची बाब मान्य केली आहे. सोबतच आम्ही या पोस्टच्या माध्यमातून विचारलेल्या सर्व प्रश्नांवर ठाम असल्याचे देखील म्हटले आहे. मात्र कॅमेरावर कुठल्याही प्रतिक्रिया देण्यास नकार दिलाय. सध्या मी माध्यमांशी बोलण्याच्या स्थितीत नसल्याचे आणि आता बोलून काय फायदा अशी गौतम करजगी यांनी हतबलता देखील व्यक्त केली आहे. या फेसबुक पोस्टबाबत आमटे कुटुंबियांची प्रतिक्रिया घेण्याचे प्रयत्न सुरु आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप सकारात्मक उत्तर आलेले नाही.


फेसबुकवरून डिलिट केलेली पोस्ट


हे पत्र मी दोन दिवांपूर्वीच लिहले होते व आज तिच्या कुटुंबियांकडून (संपूर्ण आमटे परिवार) तिला दिला गेलेला त्रास तिला सहन न झाल्यामुळे तिने स्वतःला संपवले......The End. 25-11-2020 च्या लोकसत्ता व अनेक पेपरमध्ये शितलच्या मानसिक आजाराबद्दल बातमी वाचली. खूप वाईट वाटले व आश्चर्य पण वाटले. ह्यावर काही प्रतिक्रिया द्यावी की चूप रहावे हे कळत नव्हते. परंतु शेवटी विचार केला की शितल ‘आमटे‘असून तिच्या बाबतीत जर असा अन्याय होतो आहे, तर बाकी सामान्य मुलींचे काय होत असेल?


आमटे कुटुंबांनी (तिच्या स्वतःच्या आई- वडिलांनी व काका-काकूंनी) तिच्याबद्दल असे संयुक्त निवेदन( स्वाक्षरी करून) द्यावे, ह्यासारखी लाजिरवाणी गोष्ट आणखी काय असू शकते. ज्या दिवशी गौतम- शितलचे लग्न झाले त्या दिवशीपासून शितलला मी माझी मुलगीच मानली आणि त्याच हक्काने आज मी आमटे कुटुंबियांना काहीं प्रश्न विचारते.


1. शितलने संस्थेच्या कामात खूप योगदान दिले आहे असं तुम्हीच लिहले आहे, मग जर शितलला आज काही मानसिक ताण व नैराश्य आहे तर तिला संभाळणे व आपुलकीने तिला जवळ न घेता, तिच्याशी न बोलता, तिला दूर का लोटले जाते आहे? कारण आनंदवनात सगळ्या handicapped ( mental/ physical) लोकांची काळजी घेतली जाते मग सख्या मुलीबाबत बोभाटा का? की या मागे आमटे कुटुंबाचा काही स्वार्थ आहे? डॉ. प्रकाश आमटेंना तर मुक्या प्राण्यांची भाषा कळते व ते त्यांच्याशी संवाद पण करतात, मग स्वतःच्या पुतणीशी संवाद साधता आला नाही त्यांना? सोशल मीडियावर बदनामी करण्याची गरज काय?


2. कौस्तुभ आमटे ह्यास परत विस्वस्थ मंडळावर घेतले. मला विचारावेसे वाटते की त्याला काढले का होते? खास गोष्ट म्हणजे ज्या सगळ्या ट्रस्टींनी त्याला काढले त्यांनीच त्याला परत घेतले. तर आमचा सारख्या असंख्य लोकांना हे विचारावेसे वाटते की त्याला ट्रस्टी म्हणून काढण्या मागचे कारण काय होते? आता परत घेतले तर त्यानी अशी काय विशेष कामगिरी केली? मागचा 4-5 वर्षापासून तर कौस्तुभ आमटेचे नाव पण कुठे वाचण्यात आले नाही. इतक्या वर्ष तो होता कुठे? की आमटे कुटुंब पण सर्व सामान्य माणसांप्रमाणे मुलगा ( घराण्याचा वारस) आणि मुलीमध्ये फरक करतात? आज मी सर्वांना खुले आव्हान करते की आनंदवनला जावे व शितल आणि गौतमनी जे काम केले आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी बघावे आणि मग काय ते ठरवावे. आमटेंसारख्या नावाजलेल्या लोकांनी पण मुला- मुलींमध्ये फरक करावा ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. नाही का?


उंची न अपुली वाढते फारशी वाटून हेवा।
श्रेय ज्याचें त्यास द्यावें, एवढें लक्षांत ठेवा।
ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी।
ती न कामी आपुल्या, एवढें लक्षांत ठेवा।


कौस्तुभ आमटेच्या बाबतीत वरच्या ओळी अगदी योग्य ठरतील. ज्या प्रचंड गतीने व डेडीकेशनने आज व मागच्या अनेक वर्षांपासून शितल व गौतमनी आनंदवनात काम केले आहे त्याला तोडच नाही. त्याबद्दल आम्हाला त्या दोघांचा खूप खूप अभिमान वाटतो. ईथे मला आमटे लोकांना आणखीन एक प्रश्न विचारावासा वाटतो की एक मानसिक नैराश्य असलेली व्यक्ती एवढे प्रचंड जबाबदारीचे काम कसे काय करू शकेल? आज आत्ता मी आनंदवनातच आहे व शितल व गौतम शिवाय इथे आमटे कुटुंबातील एकही जबाबदार व्यक्ती उपस्थित नाही. तिच्या व्यतिरिक्त एकही डॅाक्टर नाही. शितल एकटीच दवाखान्यातील सगळ्या आजारी लेप्रसी पेशंटची काळजी घेते आहे. मग ती जर स्वत: मानसिकरित्या आजारी आहे ( तिच्या आई-वडीलांनी पत्रात लिहिल्या प्रमाणे) तर सगळे आमटे तिच्या भरोशावर पूर्ण आनंदवन सोडून हेमलकशाला काय करत आहेत?


सगळे आमटे शितल- गौतम च्या विरूद्ध कट-कारस्थान तर रचत नाही ना? विकास आमटे व प्रकाश आमटेंबद्दल हे सगळं लिहिण्याची वेळ माझ्यावर यावी हे माझे दुर्भाग्यच आहे. त्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगावी एवढेच माझे म्हणणे आहे. शितलला कसलाही मानसिक त्रास नाही व हा त्रास तिच्यावर जबरदस्ती लादला जातोय व तो पण तिच्या सख्या आई-वडिलांकडून हे तीचे खंर दुर्भाग्य आहे. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की आमचे पुर्ण करजगी कुटुंब सदैव तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे व पुढे पण राहू.


सुहासिनी करजगी
शिरीष करजगी