Aditya Thackeray जालना : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते  आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)  यांनी  जालन्यातील (Jalna) अंबडगाव येथे अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी कापूस आणि मोसंबी उत्पादक शेतकाऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका करत आम्ही राजकीय मंडळी आणि सत्तेतील राजवटीने आता जमिनीवर उतरून शेतकऱ्यांना मदत करावी, अस आवाहन केलं. 


दरम्यान, यावेळी त्यांनी ई पीक पाहणी वरती टीका करत शेतकऱ्यांना भरावा लागत असलेला फॉर्म स्पर्धा परीक्षेतील फॉर्म सारखा असल्याचे म्हटले आहे. तर हा ई-पीक पाहणीच ॲप भरण्यासाठी शेतकऱ्यांना ट्युशन क्लास लावावा लागेल, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे. यावेळी एका मोसंबी उत्पादक शेतकऱ्याला अश्रू अनावर झाल्याचे देखील बघायला मिळाले. 


उद्धवसाहेबांनीच शब्द दिला तो पाळलाय- आदित्य ठाकरे


अतिवृष्टी सदृश्य पाऊस कोसळल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असून परिस्थिती भयानक झालेली आहे. अजूनही शेतकरी बांधव हातबल आहेत. सरकारकडून काही अपेक्षा नाही. कारण गेल्या दोन वर्षात काहीही मदत सरकारकडून झाली नाही. आम्ही राजकीय मंडळी या राजवटीला सांगत आहोत तुम्ही जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा. रात्री ऑर्डर निघून देखील पंचनामे करायला सुरुवात झाली नाही.


आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारला जाग आली आहे. आमच्या सरकारच्या वेळी उद्धवसाहेबांनीच शब्द दिला होता कर्जमुक्तीचा, तो पाळलाय. सगळीच मदत काही अपेक्षित नसते. मात्र, काळजीपूर्वक कोणी येऊन धीर द्यावा, हे अपेक्षित असल्याचे मतही आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 


ई-पीक पाहणीच ॲप भरण्यासाठी ट्युशनक्लास लावले पाहिजे


शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पिक पाहणी ॲप आणले आहे. मात्र हे ॲप लोकेशनच पकडत नसल्याचे चित्र आहे.  एवढा फॉर्म भरावा लागतो की तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसल्यासारखं हा फॉर्म भरावा लागतोय. ई-पीक पाहणीच ॲप भरण्यासाठी ट्युशन क्लास लावले पाहिजे, असा खोचक टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे ते चक्र नुसतं फिरत राहतं आणि शेतकरी त्या चक्रात अडकलेला आहे. अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे करून पाठवले, मात्र यात पुढे काही झाले नाही. असे असताना आज शासन काय करताय? मंत्री महोदय कुठे आहेत ते बघणे गरज असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.


राष्ट्रपती महोदय आज मराठवाड्यात आहे. त्यांनी देखील वक्तव्य करणे अपेक्षित आहे. कारण ते सर्वोच्च पदी आहेत. सरकारचं काम आहे लगेच मदत पोहोचणं, धीर देणे,  दुसरे म्हणजे पंचनामे करणं, ते तरी कुठे दिसतंय. मंत्री कुठे, कोणत्या जिल्ह्यात आहे,काय करतात कोणाला माहित आहे का? कृषि मंत्र्‍यांचे नाव तरी शेतकऱ्याला माहिती आहे का? हे शेतकऱ्यांना विचारा असेही ते म्हणाले. 


हे ही वाचा