दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो... 


1. राज्य शासनाचे आदेश धुडकावून मेस्टाचा आज शाळा सुरु करण्याचा निर्णय, ग्रामीण भागात पहिले ते बारावी तर मुंबई वगळता शहरात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु करणार 


2. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी राजकीय आरक्षणाचं भवितव्य आज ठरणार, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारची कसोटी


3. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणेंच्या जामिनावर आज फैसला अपेक्षित, उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष


4. अमरावतीत दर्यापूरमध्ये शिवसैनिकांनी बसवलेला शिवरायांचा पुतळा पालिकेनं हटवला, तर राजापेठ उड्डाणपुलावरचा पुतळा हटवल्यानंतर राणा दाम्पत्य आक्रमक


5. किरण माने प्रकरणावरुन मुलगी झाली हो मालिकेतील कलाकारांमध्ये दुमत, काही कलाकारांचा मानेंच्या वर्तनावर आक्षेप, तर काही कलाकारांचा पाठिंबा


पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 17 जानेवारी 2022 : सोमवार 



6. आज शाकंभरी पौर्णिमा, मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा, कोरोनामुळं भाविकांना बंदी


7.  29 वाघांना जन्म देणाऱ्या सुपरमॉम टी-फिफ्टीन वाघिणीचा मृत्यू, कॉलरवाली नावानं होती प्रसिद्ध, व्याघ्रप्रेमींमध्ये शोककळा


मध्य प्रदेशातल्या सिवनी जिल्ह्यातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातली (Madhya Pradesh's Pench Tiger Reserve ) सुप्रसिद्ध कॉलरवाली वाघिणीचा (T-15)  मृत्यू झाला आहे.शनिवारी 16 वर्षाच्या या वाघिणीने पेंच व्याघ्र प्रकल्पात अखेरचा श्वास घेतला. सर्वाधिक बछड्यांना जन्म देण्याचा रेकॉर्ड या वाघिणीच्या नावावर आहे. या वाघिणीने 29 बछड्यांना जन्म दिला आहे. 


मध्य प्रदेश राज्याला वाघांचं राज्य हे नावलौकिक मिळवून देण्यात कॉलरवाल्या वाघिणीचा मोठा हातभार राहिला आहे. तिचा जन्म सप्टेंबर २००५ मध्ये झाला. फक्त अ़डीच वर्षांची असताना तिने 3 बछड्यांना जन्म दिला. मात्र 24 तासातच त्यांचा मृत्यू झाला होता. 2008 ते 2013 दरम्यान तिने 18 बछड्यांना जन्म दिला. ज्यातले 14 जिवंत राहिले. 2015 मध्ये तिने अजून 4 बछड्यांना जन्म दिला. आतापर्यंत 8 वेळा तिने 29 बछड्यांना जन्म दिला आहे. 11 मार्च 2008 रोजी भारतीय वन्यजीव संस्थान, देहरादूनमधल्या तज्ज्ञांनी या वाघिणीला रेडियो कॉलर घातली होती. तेव्हापासून कॉलरवाली वाघिण म्हणून तिला ओळखलं जावू लागलं. पर्यंटकांना सर्वाधिक नजरेस पडणारी ती वाघिण होती. या कॉलरवाल्या वाघिणीवर टायगर स्पाय इन द जंगल हे डॉक्युमेंट्रीही तयार केली गेली आहे. पेंचची राणीही म्हणूनही ती प्रसिद्ध होती.


8. उदय सामंतांच्या बंगल्याबाहेर भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांचं पहाटे आंदोलन, विद्यापिठ कायद्याविरोधात आक्रमक


उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्या बंगल्याच्या बाहेर भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी सकाळी 5 वाजल्यापासून आंदोलन सुरु केलं. विद्यापीठ कायद्याविरोधात भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी पहाटे 5 वाजता मंत्रालयासमोरील मंत्री उदय सामंत यांच्या घराबाहेर रांगोळी काढून निदर्शनं केली. यावेळी पोस्टरवरून पोलीस आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी महिलांनी महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाही दिल्या. आंदोलनादरम्यान भाजप युवा महिला मोर्चाच्या काही महिला कार्यकर्त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला धमकी देत ​​विद्यापीठ कायद्यात बदल न केल्यास आगामी काळात महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करु, असं सांगितलं.


महाविकास आघाडी सरकारनं हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत केल्यामुळं भाजपचे युवा कार्यकर्ते पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार विरोधात मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयाच्या समोर असलेला बंगल्या बाहेर आज पहाटे 5 वाजता भाजपाच्या युवा वतीने रांगोळी काढून आंदोलन करण्यात आलं.


 9. मुंबईने तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला, टास्क फोर्स तज्ज्ञांचे अनुमान; सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत घट


सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातही दररोज 40 हजारांच्या पुढे रुग्णसंख्येची नोंद होत आहे. अशातच मुंबईमध्ये मात्र, रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. बुधुवारी मुंबईत  16 हजार 420, गुरुवारी 13 हजार 702 , शुक्रवारी 11 हजार 317, शनिवारी 10,661 तर रविवारी मुंबईत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित आढळले होते.  त्यामुळे त्यात सातत्याने घट दिसून आली. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला असल्याचे मत राज्य सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे. 


10. पद्मविभूषण कथ्थक नर्तक बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा