Prashna Maharashtrache :   धान्य, पेट्रोल-डिझेल, गॅस याच्याशी केंद्राचा संबंध आहे. त्यामुळे वेळोवेळी केंद्राने दर कमी करून सामान्य माणसांना दिलासा दिला आहे. नऊ कोटी उज्वला गॅसची कनेक्शन आहेत. त्यांना दोनशे रूपये सबसीडी देण्यात आली आहे. शिवाय केंद्राने दोन वेळा इंधनावरील कर कमी केला आहे. परंतु, राज्याजे एकदाही कर कपात केली नाही. इतर राज्यातील दरांपेक्षा आपल्याकडे 20 रूपये इंधनाचे दर जास्त आहेत. त्यामुळे राज्याने आपला कर कमी करावा आणि सामान्य माणसांना दिलासा द्यावा, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते एबीपी माझाच्या प्रश्न महाराष्ट्राचे या कार्यक्रमात बोलत होते. 


"महागाईच्या विषयावर सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. केंद्राशी संबंधीत विषय आहेत त्यासंबंधी आम्ही केंद्र सरकारशी चर्चा करून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कोरोना काळात 80 कोटी लोकांना रेशन मोफत देण्यात आले, शिवाय पहिले तीन महिने गॅस मोफत देण्यात आला. त्यामुळे राज्य सरकारने सतत केंद्राकडे बोट दाखवण्यापेक्षा आता राज्यातीलही कर कमी करावेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.   


राज्यात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित  
राज्यातील शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. कर्जमाफी पूर्ण झाली नाही, विम्याचा पत्ता नाही, वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींमधील नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. याबरोबरच  ग्रामीण भागात  लोडशेडिंग सुरू आहे. शेतकऱ्यांची कनेक्शन कट करण्यात आली आहेत. कनेक्शन कट केल्यामुळे पिकांना पाणी देता  येत नाही. त्यामुळे उभी असलेली पिके जळून जात आहेत. याबरोबरच कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटंबीयांना अद्याप मदत देण्यात आलेली नाही. ओरबीसांच्या आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे, असे अनेक प्रश्न सध्या राज्यात प्रलंबीत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.  


भाजपकडून सतत सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवला  
महागाई गगणाला भिडली असताना राज्यात सध्या इतर प्रश्नांवरून राजकाकरण सुरू आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, "भाजपकडून सतत सामान्य माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवला जात आहे. राज्यातील सध्या सुरू असलेल्या भोंगे आणि हनुमान चालिसासारख्या विषयांवर आम्ही सामान्य लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. या विषयांवर भाजपची तात्विक सहमती असली तरी यापेक्षा मुख्य प्रश्नांना भाजपकडून जास्त महत्व दिले जात आहे. 


त्यामुळे कांद्याच्या दरांमध्ये चढउतार होते 


दर दोन-तीन वर्षातून एकदा कांद्याचा देशात तुटवडा होतो. त्यामुळे दरांमध्ये चढउतार होते. कांद्याप्रमाणेच इतर धान्यांचेही दर असेच कमी-जास्त होत असतात, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. 


गुरजातला जास्त निधी दिला नाही
तौक्ते चक्रीवादळाच्या वेळी राज्याला केंद्राने मदत केली नाही यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,   "मदत आणि पुनर्वसन खात्याला केंद्राकडून दर वर्षी एक बजेट दिलं जातं. परंतु, मध्येच राज्यात एखादी आपत्ती आली तर त्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करण्यात येते. त्यामुळे गुजरातला आधीच्या त्यांच्या वर्षाला देण्यात येणाऱ्या नीधीचे पैसे देण्यात आले होते. परंतु, महाराष्ट्रापेक्षा गुजरातला जास्त मदत दिली अशी टीका करण्यात आली, यामध्ये काही अर्थ नाही,  त्यांना जास्त पैसे देण्यात आले नाहीत.