Majha Katta :  अनेकांचे उद्योजक होण्याचे स्वप्न असते. मात्र, सर्वांनाच उद्योजक होणे शक्य नसते. उद्योग सुरू करताना फक्त पैशांचीच नव्हे तर माणसांमध्ये आणि तंत्रज्ञानामध्येही गुंतवणूक आवश्यक असल्याचे अर्थ सल्लागार, उद्योजक प्रफुल्ल वानखेडे (Prafulla Wankhede) यांनी सांगितले. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर त्यांनी अर्थ साक्षरता आणि त्याचे महत्त्व अधोरेखित केले.


'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकामुळे बहुचर्चित आणि लोकप्रिय झालेल्या प्रफुल्ल वानखेडे यांनी माझा कट्ट्यावर आपले अनुभव सांगितले. त्यांनी म्हटले की, पुस्तकांचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. वर्ष 2007 मध्ये मला उद्योगात नुकसान झाल्यानंतर पुस्तकांनी मला सावरण्यास मदत केली. अनेक नामवंतांनी आपले अनुभव पुस्तकांतून व्यक्त केले होते. त्यामुळे आपलं नेमकं काय चुकलं याचा अंदाज आला. आपलं सगळं बरोबर असतं असं नाही, आपल्याकडून काही चुका होऊ शकतात, हे मान्य केलं  की पुढील प्रवास सहज शक्य आहे असेही त्यांनी म्हटले. 


नवीन उद्योग सुरू करण्याबाबत प्रफुल्ल वानखेडे यांनी सांगितले की, प्रत्येक उद्योग सुरू करताना सगळ्यांकडेच फार पैसा नसतो. माणसं, तंत्रज्ञान यामध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. 2007 मध्ये उद्योग सुरू करताना माझ्या हाती एक महिन्याचा पगार होता. उद्योग सुरू करण्यासाठी पॅशन हवी, नियोजन हवे असेही त्यांनी म्हटले. नवा उद्योग सुरू केल्यानंतर तुमचे ग्राहक तुम्हाला पैसे देतात,  असेही त्यांनी म्हटले. आपण स्वत: उद्योग सुरू केल्यानंतर एका कंपनीने आम्हाला आधीच अॅडव्हान्स दिला होता. त्यातून आम्ही पुढे काम करण्यास सुरुवात केली. नोकरीत असताना अथवा उद्योग करताना तुम्ही माणसं कशी जोडता, हेदेखील महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नवीन उद्योग सुरू करताना आणि आपल्या वाईट काळात आधी असलेले संबंध आणि चांगली प्रतिमा मदतीला आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


अर्थ साक्षरता का महत्त्वाची वाटली?


प्रफुल्ल वानखेडे यांनी म्हटले की, कोरोना काळात अनेकांची आर्थिक परिस्थिती कोलमडली होती. अनेकांना चांगला पगार असूनही अनेकांची परिस्थिती वाईट झाली होती. यामध्ये मित्र, वेंडर, ओळखीतील अनेकांचा समावेश होता. एकवेळ रोजंदारीवर असणाऱ्यांची स्थिती आपण समजू शकतो. मात्र, ज्यांना चांगला पगार आहे, आर्थिक स्थैर्य आहे. त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागेल हे दिसून आले. त्यातून हा अर्थसाक्षरता करायला हवी असे वाटले असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. 


'एबीपी माझा'मुळे बळ मिळाले


प्रफुल्ल वानखेडे यांनी म्हटले की, कोरोना काळता एबीपी माझाच्या वेब पोर्टलवर  उद्योजकांसाठी फंड मॅनेजमेंटच्या मुद्यावर ब्लॉग लिहिला होता. त्याचे स्वागत झाले. या मार्गदर्शनाची गरज होती, असे अनेकांनी म्हटले. मग, सोशल मीडियावर अर्थ साक्षरतेबाबत मांडणी करू लागलो. सोशल मीडियाचा फायदा झाला. लोकांसाठी आर्थिक साक्षरतेचा मुद्दा मांडला होता आणि त्यांना आवडला असल्याचे त्यांनी सांगितले. सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करता येऊ शकतो असेही त्यांनी म्हटले. 


यशस्वी मराठी उद्योजकांच्या गोष्टी का नाहीत?


आपल्या महाराष्ट्रात अनेकजण यशस्वी उद्योजक आहेत. अनेक उद्योजक हे आपल्या घराण्याचा वारसा चालवत आहेत. मराठी माणूसदेखील यशस्वी उद्योजक होऊ शकतो. चांगल्या मार्गाने पैसा कमावता येतो, हे आपण मनाशी बांधले पाहिजे. आपल्याकडे यशस्वी मराठी उद्योजकांच्या गोष्टी सांगितल्या जात नाहीत. मात्र, अपयशाच्या गोष्टी अधिकच सांगितल्या जातात, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 


त्यासाठी 'गोष्ट पैशापाण्याची' पुस्तक वाचू नका


झटपट पैसे कमवण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी जो 'गोष्ट पैशापाण्याची' पुस्तक वाचणार आहे, तो गंडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. हे पुस्तक अर्थ साक्षरतेबाबत आहे. वाचकांनी हे पुस्तक आनंदासाठी वाचावे. यात मातीतील गोष्ट आहे, असे समजून घ्यावे असेही त्यांनी म्हटले. 'गोष्ट पैशापाण्याची' या पुस्तकाच्या माध्यमातून अनेकांनी पहिल्यांदाच पुस्तक वाचन केले असल्याचेही त्यांनी म्हटले. 


माणुसकीचा धडा मोठा


आपल्या संघर्ष काळातील आठवण सांगताना प्रफुल्ल वानखेडे यांनी सांगितले की, पहिल्या उद्योगात मोठा फटका बसल्याने आर्थिक संकट निर्माण झाले होते. त्यावेळी मुंबईत विचारात मग्न असताना चुकून सायन येथे उतरलो होतो. त्यावेळी कांदिवलीसाठी रिक्षा घेतली. या दरम्यान, ज्यांच्याकडून पैसे घेतले होते. त्यांचे फोन आले होते. या दरम्यान माझे संभाषण रिक्षावाल्याने ऐकले. प्रवासात असताना रिक्षावाल्याने मध्येच रिक्षा थांबवली आणि मला खाऊ घातले. त्यानंतर मी माझी परिस्थिती इतकीही वाईट नाही, असे सांगण्याचा प्रयत्न करत होतो. त्यावेळी त्याने 'हमे बहोत दूर का सफर करना है, अभी कुछ बोलो मत' असे म्हटले. कांदिवली येथे उतरल्यानंतर पैसे देण्याआधीच त्याने तात्काळ रिक्षा वळवली आणि निघून गेला. ही माणुसकी मुंबई सारख्या शहरात पाहायला मिळते. हा माणुकीचा धडा माझ्यासाठी मौल्यवान असल्याची भावना वानखेडे यांनी व्यक्त केली. 



Praful Wankhede at Majha Katta : 'गोष्ट पैशापाण्याची' पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे माझा कट्ट्यावर