Ratnagiri News : रत्नागिरीचे  पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांच्या मृत्यूनंतर देशात खळबळ उडाली आहे. आरोपी पंढरीनाथ आंबेरकर (Pandharinath Amberkar)  हा रिफायनरी प्रकल्पाचा समर्थक असल्याने या संपूर्ण प्रकरणाला आता एक वेगळाच रंग आला आहे. या संदर्भात रत्नागिरीचे (Ratnagiri ) पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले आहेत की, पत्रकार शशिकांत वारिसे यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आली असून याप्रकरणी सबळ पुरावे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.


Shashikant Warise Death Case : ''आरोपीने गुन्हा कबूल केला''


उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितलं की, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण मानतो त्यानं टीका केली किंवा आपल्या विरोधात लिहिलं म्हणून रागाने काही करावं, असा काही नियम नाही आणि कोणाला असं वाटूही नये. याप्रकरणी जेव्हा मी माहिती घेतली तेव्हा असं कळलं की, ज्या व्यक्तीने हा गुन्हा केला आहे त्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आला. ते म्हणाले, पालकमंत्री म्हणून मी पोलीस तपासाची जी माहिती घेतली आहे, त्यात 302 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. आरोपीने देखील गुन्हा कबूल केला असल्याचं पोलिसांनी सामंत यांनी सांगितलं असल्याचं ते म्हणाले आहेत. 


उदय सामंत (Uday Samant) म्हणाले की, ''आरोपीने ही हत्या कशी केली, याबाबत पोलिसांना सांगितलं आहे. आरोपीने ही हत्या नियोजनपूर्वक केली आहे.'' ज्यांनी ही हत्या होताना पाहिली आहे, त्यांनी पुढे येऊन पोलिसांना याबाबत माहिती द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. ते म्हणाले आहेत की, साक्षीदाराने घाबरण्याचे कारण नाही. कोणत्याही दबावात न राहता पुढे येऊन पोलिसांना सहकार्य करावे. साक्षीदाराला हे प्रकरण निकाली लागूपर्यंत पोलीस संरक्षण देण्यात येईल, असंही ते म्हणाले आहेत.


दरम्यान, शशिकांत वारिसे यांच्या हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी पंढरीनाथ आंबेरकर हा रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील कुंभवडे या गावचा रहिवासी. सुरुवातीच्या काळात छोटासा आंबा व्यापारी असलेला पंढरीनाथ आंबेरकर 2017 सालानंतर मात्र आर्थिकदृष्टीने सक्षम झाला. कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्पाची घोषणा झाली आणि त्यानंतर त्याने काही जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. स्वतः देखील काही जमिनी खरेदी केल्या. यामध्ये त्याला आर्थिक नफा चांगलाच झाला. दरम्यानच्या काळात टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपला व्यवसाय सुरु केला आणि वाढवला. नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द झाला आताची घोषणा बारसू आणि सोलगाव येथे झाली. या ठिकाणी देखील आंबेरकर याने जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.