पुणे : मुंबईचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar Shot in Mumbai)  यांची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माणूसकीला काळीमा फासणारी घटना आणि अशा घटना कोणत्याही शहरात होता कामा नये,  तपास व्यवस्थित व्हायला हवा,असं ते म्हणाले. अजित पवार हे आज पुणे दौऱ्यावर आहे. पुण्यातील विमानतळ टर्मिनलची पाहणी कराताना ते माध्यमांशी बोलत होते. 

Continues below advertisement

याच प्रकरणी पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या राज्यात वेगवेगळ्या कारणांवरुन गोळीबार सुरु आहेत. अभिषेक घोसाळकर यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली या प्रकरणाचा नीट तपास झाला पाहिजे. या प्रकरणावरुन विरोधक मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याच्या प्रयत्न करत आहे. गृहमंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. या प्रकणारावरुन आता विरोधक सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणार आहे, असंही अजित पवार म्हणाले. कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारीला माझं समर्थन नाही. या प्रकरणाचा संपूर्ण तपास व्हायला हवा, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

जमिनीच्या वादातून, पूर्ववैमनस्यातून आणि तिसरा गोळीबाराचं कारण समोर येईल. विरोधक या प्रकरणावरुन आरोप करणार मात्र या तिन्ही वेगवेगळ्या घटना बघितल्या तर  वेगवेगळ्या कारणावरुन झालेला गोळीबार आहे. राज्यात असे गुन्हे घडायला नकोत, त्यासोबतच हे गोळीबार खासगी पिस्तुलातून गोळीबार करुन झाले आहे. त्यामुळे यापुढे पिस्तूल देताना सगळ्या गोष्टी तपासल्या जात आहे की नाही?, याची काळजी घेतली पाहिजे, असंही ते म्हणाले. या प्रकरणी योग्य तपास होऊन कारवाई केली जाणार असल्याचंही ते म्हणाले.

Continues below advertisement

नेमकं प्रकरण काय आहे?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर  यांच्यावर पैशाच्या वादावरून समोरून पाच गोळ्या झाडल्याची थरारक घटना घडली. दहीसरमध्ये काल (8 फेब्रुवारी) संध्याकाळी साडे आठच्या सुमारास ही घटना घडली. माॅरिस नोरोन्हा असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून त्याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर पाच राऊंड फायर केले. यानंतर त्याने स्वत:वर डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली. अभिषेक घोसाळकरचा मृत्यू झाला आहे. आर्थिक वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी या प्रकरणी आता मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. मेहुल पारीख आणि रोहित साहू असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावं आहेत. 

इतर महत्वाची बातमी-

मॉरिस सकाळी म्हणाला हळदीकुंकू आणि साडी वाटप करु, संध्याकाळी घोसाळकरांचा स्वत:च्या कार्यालयात गेम केला