उस्मानाबाद : देशभरातल्या 9 कोटी गाई-म्हशींना स्वत:ची ओळख मिळवून देण्याचं काम मोदी सरकारनं हाती घेतलं आहे. जनावरांना 12 अंकी आधार कार्ड मिळणार आहे.


गेल्या दोन महिन्यात 30 कोटींपैकी 85 लाख जनावरांना स्वत:ची ओळख मिळाली आहे. महाराष्ट्रातही हे काम
धुमधडाक्यात सुरु आहे. भविष्यात माणसांच्या आधार कार्डसारखी जनवारांची इत्यंभूत माहिती एका क्लिकवर मिळू शकेल.

यामागे दुधाळ जनावराची माहिती संकलित करण्याचा हेतू सांगितला जात असला तरी गोमातेची कत्तलही या युनिक नंबरमुळे थांबवता येऊ शकेल. जनावरांचा 12 अंकी युनिक ओळख क्रमांक असलेलं आधार कार्ड फायबरचं आहे. म्हणजेच न तुटणारं. कान कापला किंवा जनावरं मेलं तरच हा टॅग निघेल.

गेल्या महिन्यापासून महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागानं आदेश दिले. 'गावागावात जा, शिबिरं घ्या.. हा टॅग आणि पंचिंग मशिन सोबत न्या..' पंचिंग मशीन मध्ये टॅग लावायचा. पिन बसवायची आणि लहानग्यांचे कान टोचल्यासारखे जनावराचे कान टोचायचे.

जनावरांना ओळख मिळवून देण्याचा मोदी सरकारचा देशव्यापी प्रयत्न आहे. या नंबरवर त्या-त्या जनावरांचा वर्ण, जात, गवळावू, देशी की देवणी की विदेशी. शिंगं सरळ का वाकडी.. शेपूट गोंडा.. जसं जनावरांचा रंग पांढरा असला तरी शेपूट काळं असू शकतं.. अशी माहिती आहे...

महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावातील दुधाळ आणि भाकड जनावरांची संख्या, गावात जनावरे किती, त्यातली दुधाळ किती आणि भाकड किती याची माहिती संकलीत होत आहे. . कार्डनुसार गाई म्हशीला टॅग दिल्यावर लसीकरण, रेतन, व्याली कधी, काय जन्मलं ही यांची माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

जनावरांना स्वत:ची ओळख मिळाल्यानं विक्री व्यवहारासाठी दाखल्याची गरज नाही. हा 12 अंकी क्रमांक पुरेसा आहे. शेतकऱ्यांची दाखल्यासाठी होणारी वणवण थांबेल. टॅगवर महाराष्ट्र पशु विकास महामंडळाचं नाव आहे. म्हणजे जनावर परराज्यात गेलं तरी समजणार आहे.