मुंबई : लॉकडाऊनच्या काळात 22 मार्च ते दोन मे या कालावधीत राज्यात कलम 188 नुसार 91 हजार 217 गुन्हे दाखल झाले आहेत. या दरम्यान 18 हजार 48 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी तीन कोटी 25 लाख (3 कोटी 25 लाख) रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे. दरम्यान, या लॉकडाऊनच्या काळात घरगुती अत्याचारामध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वीच राज्याचे गृहमंत्री यांनी घरगुती अत्याचारावरुन नागरिकांना इशारा दिला होता.


कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. आता उद्यापासून राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू होईल. या लॉकडाऊनच्या काळात राज्यात 188 कलम लावण्यात आले आहे. राज्यभरात पोलीस विभागाच्या 100 नंबर वर 82,294 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वॉरंटाईन असा शिक्का आहे, अशा 630 व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवल्याची माहिती दिली आहे. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या एक हजार 255 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर, 51 हजार 719 वाहने जप्त करण्यात आली. परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले गेले आहेत.


राज्य सरकारचा मोठा निर्यय! रेड झोनमध्येही कंटेनमेंट झोन वगळता दारु विक्रीची परवानगी


पोलिसांवर हल्ला प्रकरणे
या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या 173 घटनांची नोंद झाली असून यात 659 आरोपींना अटक करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील 24तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्देवाने 51 पोलीस अधिकारी व 310 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 23 पोलीस अधिकारी व 26 कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या 28 पोलीस अधिकारी व 281 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्देवाने तीन पोलीस कर्मचाऱ्यांचे दुःखद निधन झाले.


CRPF | अधिकाऱ्याला कोरोनाची लागण, दिल्लीतलं सीआरपीएफ मुख्यालय सील


पोलिसांना 50 लाखांचं कवच
राज्यात आतापर्यंत 310 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर, तीन पोलिसांचा यामुळे मृत्यू देखील झाला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना संकटकाळात महाराष्ट्र पोलिसांना 50 लाखांचे कवच मिळणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. राज्यातील पोलीस दल कोरोनाविरुद्धच्या लढाईत जोखीम पत्करुन योगदान देत आहे. कर्तव्य बजावताना पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये सानुग्रह अनुदान देणार, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.


Coronavirus | वरळीच्या पोलीस वसाहतीत कोविड कॅम्प