औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील ऑरिक सिटी प्रकल्पाकडे 8 मोठ्या प्रकल्पांनी पाठ फिरवली आहे. त्यात प्रसिद्ध मोटर कंपनी ह्युंदाईनं मराठवाड्यातील प्रस्तावित गुंतवणूक महाराष्ट्राऐवजी आंध्रप्रदेशात हलवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठवाड्याच्या औद्योगिक विकासात मैलाचा दगड बनू पाहणाऱ्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचा ऑरिक सिटी प्रकल्प औरंगाबादमध्ये होऊ घातला होता. मात्र ह्युंदाईच्या या निर्णयामुळे त्याला पूरक उद्योग येण्याचीही शक्यता कमी झाली आहे. ऑरिक सिटी हा देशातील सर्वात आधुनिक प्रकल्प असून या प्रकल्पामुळे 30 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे, मात्र मोठ्या कंपन्यांनी प्रकल्पाकडे पाठ फिरवल्यानं प्रकल्पावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरचा ऑरिक सिटी प्रकल्पामध्ये इंग्लंडमधील देलारू, प्रिमिअम ट्रान्समिशन, नेस्लेसह अनेक  उद्योग आणि किया मोटर्सशी आपले उद्योग उभारणार  आणि 3 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. मात्र ह्युंडाई मोटार्सच्या या निर्णयामुळे दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरमधील पहिल्याच मोठ्या गुंतवणुकीला धक्का बसला आहे. मराठवाड्यातील मोठ्या उलाढालीला यानिमित्ताने ब्रेक लागला आहे.

औरंगाबाद शहरात बजाज कंपनीनं गुंतवणूक केली आणि औरंगाबादच्या विकासाची गती अनेक पटीनं वाढली. औरंगाबादेत ह्युंडाई कंपनी आली असती औरंगाबादच्या विकासाबरोबरच  15 हजार कुशल कामगारांना रोजगार मिळाला असता. मात्र या कंपनीला सरकारी दरबारी योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं औरंगाबादच्या विकास जो पर्यंत एखादी मोठी कंपनी येत नाही तो पर्यंत होणार नाही

मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरच्या ऑरिक सिटी प्रकल्पासाठी शेंद्रा परिसरातील 2100 एकर आणि बिडकीन परिसरातील 7900 एकर क्षेत्र दिले गेले. ह्युंदाई मोटर्स औरंगाबादच्या प्रकल्पातून लहान एसयूव्ही आणि सेडान कारची निर्मिती करणार होते. दरवर्षी 3 लाख कार निर्मितीची क्षमता या उद्योगाची होती. या प्रकल्पासाठी पुरवठादार असलेल्या कोरियन कंपन्यांनाही मोफत जागा द्यावी, अशी मागणी कंपनीने सरकारकडे केल्यामुळे महाराष्ट्र सरकारने कंपनीसाठी सुरू असलेले प्रयत्न थांबवले. ही मागणी आंध्रने मान्य केली आणि सात हजार कोटींची गुंतवणूकीवर पाणी फेरलं गेलं आहे.

या इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये उद्योग यावेत, यासाठी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज्यातील उद्योजकांना सोबत घेऊन अमेरिकेत दौरा केला. महाराष्ट्रात उद्योगांनी गुंतवणूक करावी, असे तिथे आवाहन केले. मात्र गेल्या 6 महिन्यात शेंद्रा वसाहतीत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जवळपास 8 उद्योगांनी ऑरिक सिटीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यापुढे येणारे उद्योग याचा विचार जरूर करतील. शिवाय सरकारही या प्रकल्पासाठी दिलेला निधी वेळेत देतील का हा प्रश्न आहेच.

यापुर्वी फॉक्सकॉन कंपनीने ऑरिक सिटी प्रकल्पासाठी अनुकूलता दर्शविली होती. या कंपनीने औरंगाबादेत पाहणी केली. त्यांनी जागाही निश्चित केली, पण मराठवाड्यातील राजकीय दबाव कमी पडला आणि हा प्रकल्प पुणे,नागपूर आणि मुंबईला विभागला गेला. ऑरिकमध्ये अद्याप एकही उद्योग आलेला नाही. त्यामुळे ऑरिकचा नुसताच असलेला फुगा फुटतो की काय, अशी भीती आता औरंगाबादेतील उद्योजकांना वाटत आहे..