6th June in History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. इतिहासात घडलेल्या घडामोडींचा भविष्यकाळावरही त्याचा परिणाम होत असतो. या घटनेतून प्रेरणा मिळते, काही शिकण्यास मिळते. अशीच एक घटना आजच्या दिवशी झाली. स्वराज्याचे ध्येय घेऊन सुरू झालेल्या लढ्यातला आजच्या दिवशी मोठा टप्पा पार पडला. शिवाजी महाराजांचा आजच्या दिवशी राज्याभिषेक झाला. तर, आजच्या दिवशी अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील भारतीय लष्कराचे ऑपरेशन ब्लू स्टार संपले. जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी....


1674:  शिवराज्याभिषेक दिन


छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596  म्हणजेच 6 जून 1674 ला स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याच्या जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वेसर्वा. ‘मराठ्यांचे बंड’ नसून सार्वभौम राज्याची स्थापना आहे हे या राज्याभिषेकाने पटवून दिले. हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. 


महाराष्ट्रातील गोरगरीब सर्वसामान्य, अठरापगड जातीच्या भूमीपूत्र मावळ्याच्या सहाय्याने शिवरायांनी परकीय सत्ताधिशांविरुद्ध स्वतंत्र ढा आरंभ करुन गुलामगिरीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेची मने आणि मनगटे स्वतंत्र, स्वराज्याच्या प्ररणेने जिवंत बनवली. स्वराज्य स्थापन करताना शिवाजी महाराजांना आदिलशाही, मुघलांशी लढा देताना स्वकीयांचाही सामना करावा लागला होता. विविध जाती-धर्मातील लोकांना एकत्र करत शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य उभारले. 


शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. स्वतंत्र राज्याची ‘राज्याभिषेक शक’ ही नवीन कालगणना सुरू केली. आर्थिक व्यवहारासाठी शिवराई आणि होन अशी मोडी (मराठी) लिपीतील नाणी चलनात आणली. 


1929 : भारतीय अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि राजकारणी सुनील दत्त यांचा जन्म


बलराज दत्त उर्फ सुनील दत्त यांचा आज जन्म दिन. सुनील दत्त यांनी सिनेसृष्टी, राजकारण, समाजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला. सुनील दत्त हे 1950 आणि 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धातील हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रमुख कलाकारांपैकी एक होते. त्यांनी मदर इंडिया (1957) साधना (1958), इंसान जाग उठा (1959), सुजाता (1959), आदी गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. दो (1963), गुमराह (1963), वक्त (1965), खानदान (1965), मेरा साया (1966) आणि पडोसन (1967), आणि हमराज (1967), हीरा (1973), प्राण जाए पर वचन ना जाए (1974) ), नागिन (1976), जानी दुश्मन (1979), मुकाबला (1979), आणि शान (1980) या चित्रपटातील त्यांच्या भूमिका संस्मरणीय ठरल्या. भारत सरकारने पद्मश्रीने सन्मानित केले. सुनील दत्त हे लोकसभेत निवडून गेले होते. 1984 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले आणि मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून पाच वेळा निवडून आले. डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये (2004-2005) युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री होते. 



1984: ऑपरेशन ब्लू स्टार मोहीमची समाप्ती


शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदिरात 3 जून ते 6 जून 1984 दरम्यान मोठी चकमक झडली होती. अमृतसरमधील सुवर्णमंदीरात शीख अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवली होती व हे मंदीर दहशतवाद्यांचे प्रमुख तळ बनले होते. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांनी यातुन कारवाया चालवल्या होत्या. जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना या चकमकीत ठार करून त्यांच्या कारवायांचा बिमोड करण्यात आला. शीखांसाठी खलिस्तानची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर खलिस्तानवाद्यांनी हिंसाचार घडवून आणला.  पंजाबमधील राजकीय घडामोडी, त्यातुन फुटीरतावाद्यांना वाढत जाणारा पाठिंबा, खलिस्तानची मागणी व या सर्वांना मिळणारा शीख धार्मिक पाठिंबा यासर्वांचे पर्या‍वसान पंजाबमधील सामाजिक, राजकीय आणि धार्मिक हिंसाचारात झाले व परिस्थिती बिघडण्यात कारणीभूत ठरले. अखेरीस ऑपरेशन ब्लू स्टारचा निर्णय तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला व भारतीय सैन्यास कारवाईचे आदेश दिले. जर्नेल सिंह भिंद्रनवाले सह बरेच दहशतवादी यात मारले गेले. 


ऑपरेशन ब्लू स्टारचे नेतृत्व तत्कालिन मेजर जनरल कुलदीप सिंह बरार यांनी केले. सुवर्ण मंदिर व आजुबाजुच्या इमारती दहशतवाद्यांचे गढ बनल्या होत्या. जर्नेल सिंह स्वतः सुवर्ण मंदिरात अकाल तख्त या अतिशय महत्त्वाच्या भागात होते. ऑपरेशन ब्लू स्टार राबवले नसते तर पाकिस्तानच्या पाठिंब्यावर खलिस्तान राज्याची स्थापना झाली असती असे अभ्यासक म्हणतात. 


भारत सरकारने दिलेल्या अधिकृत आकडेवारी नुसार यात भारतीय सेनेचे 83 जण मारले गेले. यात चार अधिकारी , चार कनिष्ठ अधिकारी आणि 75 जवान होते. सुमारे 200 जण जखमी झाले. तर 492 दहशतवादी या कारवाईत मारले गेले. काहींच्या मते प्रत्यक्षात जीवितहानीचा आकडा यापेक्षा मोठा होता. 


2002 : मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन


शांता शेळके या ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक आणि गीतकार होत्या. त्यांचे संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. मुक्ता आणि इतर गोष्टी (1944) हा त्यांचा पहिला कथासंग्रह स्वप्नतरंग (1945) ही त्यांची पहिली कादंबरी तर शब्दांच्या दुनियेत (1959) हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. 1996 मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. ह्यांखेरीज फाय फाउंडेशन मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘वाक्‌विलास’ यशवंतराव चव्हाण गदिमा सु. ल. गद्रे इ. अनेक पुरस्कार आणि मानसन्मान त्यांना लाभले. 



इतर महत्त्वाच्या घटना: 


1930: गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना.


1961: स्विस मानसशास्त्रज्ञ कार्लगुस्टाफ जुंग यांचे निधन.


1967: इस्रायली सैन्याने गाझा ताब्यात घेतला.


1971: सोव्हिएत संघाने सोयुझ 11 चे प्रक्षेपण केले


1981: बिहारमधील बागमती नदीत ट्रेन पडल्याने सुमारे 800 लोक मरण पावले. हा देशातील सर्वात मोठा रेल्वे अपघात मानला जातो. मानसीहून सहरसाकडे जाणाऱ्या या पॅसेंजर ट्रेनचे नऊपैकी सात डबे नदीत पडले.


1982 : इस्त्रायलने लेबनॉनवर आक्रमण केले.