गडचिरोली : शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत नक्षल्यांचा झालेला खात्मा तसेच दररोजच्या हिंसाचाराला कंटाळून वरिष्ठ नक्षल्यांसह अनेक जहाल नक्षल्यांनी आतापर्यंत आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे नक्षली मोठया संख्येने आत्मसमर्पण करत आहेत.


एकूण 31 लाख 50 हजार रुपये बक्षीस असलेल्या सहा जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. यामध्ये एक पुरुष आणि पाच महिला नक्षल्यांचा समावेश आहे. संदीप उर्फ महारु चमरू बढे (वय 30 - जहाल नक्षली - फेब्रुवारी 2009 मध्ये शपथ घेऊन तो नक्षलीवादी संघटनेत सहभागी झाला आहे)त्याच्यावर चकमकीचे 17 गुन्हे, खुनाचे चार गुन्हे, जाळपोळीचे सात गुन्हे, अपहरणाचे दोन गुन्हे दाखल असून शासनाने त्याच्यावर एकूण सहा लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

  1. मनिषा उर्फ बाली उर्फ गंगाबाई जगनुराम कुरवामी (वय 30 - डिसेंबर 2003 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली. 2004 पासून ती कसनसूर दलमच्या सदस्यपदी कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे नऊ गुन्हे, खुनाचा एक गुन्हा आणि जाळपोळीवे दोन गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर शासनाने पाच लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

  2. स्वरुपा उर्फ संथिला उर्फ सरीता सुकलू आतला (वय 23) ही ऑगस्ट 2014 मध्ये चातगाव दलमच्या सदस्य पदावर भरती झाली. जून 2016 ते ऑक्टोबर 2017 पर्यंत टिपागड दलममध्ये कार्यरत होती. ऑक्टोबर 2018 ते आतापर्यंत ती प्लाटून क्रं. 3 मध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे सहा गुन्हे व खुनाचा चार गुन्हे दाखल आहेत. तिची माहिती देणाऱ्याला शासनाने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

  3. अनी उर्फ मिला मोतीराम तुलावी ही 2008 ला गट्टा दलमच्या सदस्य पदावर भरती झाली. 2014 पर्यंत तिथे कार्यरत होती. 2014 ते 2019 पर्यंत ती कंपनी क्रं. चारच्या सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे 14 गुन्हे, खुनाचे पाच गुन्हे व जाळपोळीचे तीन गुन्हे दाखल आहेत. तिची माहिती देणाऱ्याला शासनाने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

  4. ममिता उर्फ ममता जन्ना राजु पल्लो (वय 20) 2016 मध्ये चामोशी दलममध्ये भरती झाली. फेब्रुवारी 2017 नंतर ती कंपनी क्रमांक चारच्या सदस्यपदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे तीन गुन्हे आणि जाळपोळीचा एक गुन्हा दाखल आहे. शासनाने तिच्यावर पाच लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

  5. तुलसी उर्फ मासे सन्तू कोरामी (वय 24 )2010 मध्ये कसनसूर दलममध्ये भरती झाली. त्यानंतर मार्च 2010 पासून ती कंपनी क्रमांक 10 च्या सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे सहा गुन्हे दाखल असून तिच्यावर शासनाने पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.


गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबवल्यामुळे 2019 मध्ये आतापर्यंत एकूण 29 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून यात तीन डिव्हीसी, दोन दलम कमांडर, एक दलम उपकमांडर, 22 सदस्य, एक जनमिलिशिया यांचा समावेश आहे. तर 21 नक्षल्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. 2005 पासून आतापर्यंत एकूण 633 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे.