4th July In History: आजचा दिवस भारताच्या इतिहासाच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. ब्रिटीश, डच, पोर्तुगीज यांच्यावर समुद्रात वचक ठेवणारे मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचा आज स्मृतीदिन आहे. तर, आजच्या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी समाधी घेतली. भारताच्या फाळणीचा ठराव ब्रिटीश संसदेत आजच्या दिवशी मांडण्यात आला होता.  


1729:  मराठा आरमारप्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचे निधन Kanhoji Angre 


छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचा स्मृतीदिन. कान्होजी आंग्रे यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.


कान्होजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आले. ब्रिटिशांनी केलेले अनेक हल्ले कान्होजी आंग्रे यांनी परतवून लावले. ब्रिटिशांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली होती. पण, उलट त्यांना अपयशाचे तोंड पाहावे लागत असे. ब्रिटिशांची जहाजे आंग्रे यांनी ताब्यात घेतली. इंग्रजांनी आंग्रे यांना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात आरमाराचे महत्त्व कान्होजी आंग्रे यांनी चांगलेच ओळखले होते. मृत्यूपर्यंत आंग्रे यांचे सुरतेपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत अनिर्बंध वर्चस्व होते.


अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे. एकेकाळी जिथे एक ब्रिटिश किल्ला होता तिथे आता भारतीय आरमाराचा वेस्टर्न नेव्हल कमांडचा तळ आहे. या तळाला कान्होजी आंग्रेंच्या गौरवाप्रीत्यर्थ आय एन एस आंग्रे असे नामकरण केले गेले आहे.


1776: अमेरिकेने इंग्लंडपासून स्वातंत्र्य जाहीर केले US Independence Day 


18 व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी उत्तर अमेरिकेतील ब्रिटिश वसाहतींनी केलेल्या उठावास अमेरिकेचे स्वातंत्र्ययुदध किंवा अमेरिकन क्रांती म्हणून संबोधले जाते. 


सतरावे शतक व अठराव्या शतकाचा प्रथम चरण अशा दीर्घ कालावधीत अमेरिकेत अनेक यूरोपीय देशांच्या वसाहती स्थापन झाल्या. त्यात इंग्‍लंडच्या तेरा वसाहती होत्या. या तेरा वसाहतींत स्थानिक वन्य जमाती, निग्रो गुलाम, इंग्रज, आयरिश, जर्मन, डच, स्पॅनिश, पोर्तुगीज आदी युरोपीय देशांचे नागरीक होते. बहुतेक वसाहतींचा कारभार ब्रिटिश शासनाने नियुक्त केलेला गव्हर्नर स्थानिक प्रातिनिधिक संस्थांच्या सल्ल्याने चालवत असे. 


फ्रेंच वसाहतींचा घेरा सभोवताली असल्याने ब्रिटिश वसाहतवाल्यांत सतत असुरक्षितपणाची भावना असे. स्वसंरक्षणासाठी मायदेशाच्या सैन्याची आवश्यकता असल्याने, मायदेशाने घातलेली अनेक राजकीय व आर्थिक बंधने त्यांना निमूटपणे मान्य करावी लागत. वसाहती म्हणजे स्वस्त व मुबलक कच्चा माल पुरविणारे, तसेच हव्या त्या चढ्या दराने पक्का माल घेणारे देश, असे इंग्‍लंडचे सर्वसाधारण धोरण असे. वसाहतींचा वाहतूक-व्यापार इंग्‍लंडच्याच बोटींतून (वसाहतींना स्वतंत्र बोटी नसल्याने) चालला पाहिजे, वसाहतींनी कच्चा माल इंग्‍लंडलाच विकला पाहिजे, इंग्‍लंडचाच पक्का माल विकत घेतला पाहिजे, स्वतः पक्का माल तयार करता कामा नये, कोणत्याही देशांतून माल आयात केल्यास तो प्रथम इंग्‍लंडमध्ये उतरवून मग वसाहतींत देण्यात जावा, असा कायदा होता. 


अमेरिकेच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात 16 डिसेंबर 1773 रोजी घडलेल्या बोस्टन टी पार्टी घटनेचं मोठं महत्व (Boston Tea Party Importants) आहे. ब्रिटिश राजवटीविरुद्ध सुरू झालेली ही पहिली चळवळ होती. याच घटनेमुळे स्वातंत्र्याच्या चळवळीला गती मिळाली. ना प्रतिनिधी ना कर (No Representative No Tax) या सूत्राचा वापर करत अमेरिकन जनता आता विनाकारण कोणताही कर स्वीकारणार नाही असा संदेश अमेरिकन जनतेने ब्रिटिशांना दिला. हे आंदोलन अमेरिकेत असलेल्या 13 अमेरिकन वसाहतीपर्यंत चालले आणि स्वातंत्र्याचा लढा सुरू झाला. या बोस्टन टी पार्टी आंदोलनानंतर वसाहतवाद्यांच्या लढ्याला बळ मिळाले. ब्रिटीश सैन्यास युद्धाचा अनुभव असून त्यांना हे अमेरिकन स्वातंत्र्यसैनिकांसोबतचे युद्ध जड गेले. अखेर काही वर्षांच्या संघर्षानंतर ब्रिटिशांना अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांसोबत चर्चा करावी लागली. 


अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा ( United States Declaration of Independence) हा अमेरिकेच्या 13 वसाहतींनी ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळवल्याचा उद्घोष करणारा, 4 जुलै 1776 रोजी संमत करून जारी केलेला जाहीरनामा होता. 


1826 : अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष जेफरसन यांचे निधन 


अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या सुवर्णमहोत्सवाच्या दिवशी अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष थॉमस जेफरसन आणि दुसरे राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडॅम्स यांचे निधन झाले. जाहीरनाम्याचे लेखन प्रामुख्याने थॉमस जेफरसन यांनी केले होते. 


1902: स्वामी विवेकानंद यांचे निधन Swami Vivekananda Death Anniversary


नरेंद्रनाथ दत्त अर्थात स्वामी विवेकानंद हे एक भारतीय संन्यासी आणि तत्त्वज्ञ होते.रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. ते पाश्चात्य गूढवादाने प्रभावित झाले. तसेच त्यांनी पाश्चात्य जगाला वेदांत आणि योगाच्या भारतीय दर्शनांचा परिचय करून देण्यात प्रमुख भूमिका निभावली. विवेकानंदांनी रामकृष्ण मठ आणि रामकृष्ण मिशनची स्थापना केली


19 व्या शतकाच्या उत्तरार्धात हिंदू धर्माला प्रमुख जागतिक धर्माच्या दर्जात आणून आंतरधर्मीय जागरूकता वाढवण्याचे श्रेय विवेकानंदांना दिले जाते. भारतातील हिंदू सुधारणा चळवळींमध्ये ते प्रमुख होते. त्यांनी ब्रिटिशशासित भारतात राष्ट्रवाद आणण्यात त्यांनी योगदान दिले. 


1893 मध्ये शिकागो येथील जागतिक धर्माच्या परिषदेत हिंदू धर्माचा परिचय दिला. या धर्म परिषदेत माझ्या अमेरिकेच्या बहिणी आणि बंधूंनो...", या शब्दांनी सुरू केलेले भाषण चांगलेच गाजले.  


रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामी विवेकानंद यांनी केला. 


 4 जुलै 1902 ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. 


1947 : भारताच्या फाळणीचा ठराव ब्रिटीश संसेदत मांडण्यात आला


भारताची फाळणी माउंटबँटन योजनेनुसार करण्यात आली. प्रत्यक्ष फाळणीची प्रक्रिया "मांउटबॅटन योजने"नुसार पार पडली. ब्रिटिश सरकारने नेमलेल्या सिरिल रेडक्लिफ या आधिकाऱ्याने प्रत्यक्ष सरहद्द निश्चित केली. हिंदू बहुसंख्य असणारे प्रांत, विभाग भारतात आणि मुस्लिम बहुसंख्य असणारे प्रांत, विभाग पाकिस्तानमध्ये समाविष्ट करण्यात आले. ब्रिटिशांनी केलेली फाळणी सदोष असल्याचे म्हटले जाते. भारताची फाळणी करून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांना स्वातंत्र्य देण्याबाबतचा ठराव ब्रिटीश संसदेत मांडण्यात आला. पुढे 18 जुलै 1947 रोजी ब्रिटीश संसदेने या ठरावाला मंजुरी दिली. 



इतर महत्त्वाच्या घडामोडी


1790: भारताचे सर्वेक्षण करणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा जन्म


१८९८: भारताचे दुसरे पंतप्रधान गुलझारीलाल नंदा यांचा जन्म


1936: अमरज्योती हा प्रभातचा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.


1946: फिलिपाइन्सला अमेरिकेपासून स्वातंत्र्य मिळाले.


1982: भक्तिप्रधान, पौराणिक चित्रपटांचे गीतकार भरत व्यास यांचे निधन.


1999: लष्कराच्या 18 व्या बटालियनने कारगिलमधील द्रासमधील टायगर हिल्स हा महत्त्वाचा टापू पाकिस्तानी सैन्य, घुसखोरांच्या ताब्यातून मुक्त केला.