On This Day In History : मराठ्यांच्या इतिहासात आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 3 एप्रिल 1680 रोजी अखेरचा श्वास घेतला आणि अवघा मराठी मुलूख पोरका झाला. त्याचसोबत तंत्रज्ञानाच्या दृष्टीने आजच्या दिवशी दोन मोठे बदल झाले. पोर्टेबल सेल फोनवरुन पहिला कॉल आजच्याच दिवशी करण्यात आला होता, तसेच हिल्या पोर्टेबल संगणकाचे मॉडेलचं सादरीकरणही आजच्याच दिवशी झालं होतं. यासह आजच्या इतिहासातील इतर महत्त्वाच्या घडामोडींवर नजर टाकू, 


1680: छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन 


मराठ्यांच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला. 3 एप्रिल 1680 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांनी रायगडवर अखेरचा श्वास घेतला. सततच्या धावपळीमुळे, लढायांमुळे ते आजारी पडले आणि त्यातच त्यांच निधन झालं. 


19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवरायांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्यांनी आपल्या सवंगड्यांसोबत तोरणा गड घेतला आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. महाराष्ट्रात आदिलशाही, निजामशाही आणि मुघलांनी महाराष्ट्रात गोंधळ घातला होता, शेतकऱ्यांना लुटलं होतं, इथल्या आया-बहिणींची आब्रू लुटली होती. अशा वेळी या सत्तांच्या विरोधात शिवरायांनी जिवाला जीव देणारी सवंगडी निवडली आणि रायरेश्वरच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेचा संकल्प सोडला. 


वडील शहाजीराजे आणि आई जिजामाता यांच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांनी हे महाराष्ट्रावर असलेलं गुलामीचं जोखड उखडून फेकून दिलं आणि खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य स्थापन केलं. इथल्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अन्यथा शेतकरी म्हणतील यांच्यापेक्षा तो गनिम बरा... अशा आशयाचा आदेश त्यांनी मावळ्यांना दिला होता. त्यावरून त्यांना 'जाणता राजा' का म्हणतात याची प्रचीती येते. 


शिवरायांनी 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक केला आणि रयतेचं स्वराज्य स्थापन झाल्याची दवंडी फिरवली. भारतातील सर्वश्रेष्ठ राजांमध्ये शिवरायांचे नाव सर्वात वरती घेतलं जातं. वरती पुण्यापासून ते दक्षिणेकडे अगदी तंजावरपर्यंत त्यांनी मराठ्यांचा दरारा प्रस्थापित केला. सर्वधर्म समभाव हे तत्व खऱ्या अर्थाने शिवरायांनी आचरणात आणलं आणि मराठ्यांचं स्वराज्य हे खऱ्या अर्थाने सुराज्य केलं. दक्षिणेकडील दिग्विजयाच्या वेळी ते रायगडला परत आले त्यावेळी त्यांची बरीच धावपळ झाली होती. त्यातच ते आजारी पडले आणि वयाच्या केवळ 50 व्या वर्षी, 3 एप्रिल 1680 रोजी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या जाण्याने रायगडच नव्हे तर सबंध मराठी मुलूख पोरका झाला. 


1903: समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसैनिक कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्म


1914 : फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा जन्म 


फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ (Sam Manekshaw) यांचा जन्म 3 एप्रिल 1914 या दिवशी अमृतसर या शहरात झाला. चार दशकांच्या लष्करी कारकिर्दीत त्यांनी पाच लढाया लढल्या. दुसऱ्या महायुद्धात ब्रिटीश भारतीय सैन्यात सेवा बजावलेल्या माणेकशॉ यांनी 1971 च्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला धूळ चारली. फील्ड मार्शल सॅम होर्मुसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ, ज्यांना सॅम माणेकशॉ आणि सॅम बहादूर या नावाने ओळखले जात. सॅम माणेकशॉ फील्ड मार्शल या पदावर बढती मिळालेले पहिले भारतीय सैन्य अधिकारी होते. 


1929: प्रसिद्ध हिंदी लेखक निर्मल वर्मा यांचा जन्म.


1942: दुसऱ्या महायुद्धात जपानने अमेरिकेवर लष्करी कारवाईची शेवटची फेरी सुरू केली.


1973: मार्टिन कूपरने मोबाईल फोनवरुन जगातील पहिला कॉल केला 


आजचा दिवस तंत्रज्ञानाच्या इतिहास महत्त्वाचा दिवस असून 1973 मध्ये आजच्या दिवशी मार्टिन कूपरने (Martin Cooper) बेल लॅब्सच्या जोएल एस. एंजेल यांना पोर्टेबर सेल फोनवरून (handheld portable cell phone) पहिला फोन केला. कूपर यांना आजच्या मोबाईल फोनचे जनक म्हटले जाते. त्यावेळी कूपरने मोटोरोला कंपनीत काम केले. यूएसमध्ये 1930 पासून कार फोन वापरात होते. 3 एप्रिल रोजी मोबाईल फोन कूपरने प्रथमच वापरला होता. मार्टिन कूपर याला आजच्या मोबाईल फोनचे जनक म्हटलं जातं.


1981: पहिल्या पोर्टेबल संगणकाचे मॉडेल सादर


मोबाईल आणि कॉम्प्युटरशिवाय आजच्या जगाची कल्पनाही करता येत नाही. या दोन मोबाईल आणि कम्प्युटरच्या शोधामुळे दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञानाचा चेहरामोहरा बदलला आहे. हे मनोरंजक आहे की या दोन्ही महान शोधांचा 3 एप्रिलच्या दिवसाशी विशेष संबंध आहे. 1981 मध्ये, 3 एप्रिल रोजी, ऑस्बोर्न कॉम्प्युटर कॉर्पोरेशनच्या अॅडम ऑस्बोर्नने डिझाइन केलेल्या पहिल्या पोर्टेबल कॉम्प्यूटर प्रोटोटाइपचे सॅन फ्रान्सिस्कोमधील ब्रूक्स हॉलमध्ये अनावरण करण्यात आले. त्याचे वजन सुमारे 24 पौंड होते. 


1984: राकेश शर्मा यांची अंतराळ प्रवासासाठी निवड 


भारताचे स्क्वाड्रन लीडर राकेश शर्मा (Wing Commander Rakesh Sharma) यांची सोव्हिएत रशियाच्या वाहनातून (Soyuz T-11) अंतराळ प्रवासासाठी निवड करण्यात आली. अशी कामगिरी करणारे ते पहिले भारतीय ठरले.


1999: भारताने पहिला जागतिक दळणवळण उपग्रह इनसॅट 1E अवकाशात पाठवला.


2010: अॅपलचा पहिला आयपॅड बाजारात आला


Apple Inc. यां कंपनीचा पहिला आयपॅड 3 एप्रिल 2010 रोजी बाजारात आला. अॅपल ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे ज्याचे मुख्यालय क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथे आहे. 1 एप्रिल 1976 रोजी, स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs), स्टीव्ह वोझ्नियाक (Steve Wozniak) आणि रोनाल्ड वेन (Ronald Wayne) यांनी कॅलिफोर्नियामध्ये Apple Inc. ची स्थापना केली होती.