28th December In History : इतिहासात प्रत्येक दिवशी काही ना काही महत्वाचं घडलेलं असतं. 28 डिसेंबरचा दिवस देखील देशाच्या आणि जगाच्या इतिहासात खूप महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 1875 रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची (Indian National Congress) स्थापना झाली. 'टाटा सन्स'चे माजी अध्यक्ष  आणि उद्योजक रतन टाटा यांचा आज वाढदिवस आहे. त्याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा जन्मदिन आहे.


1885 : राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना  Indian National Congress Foundation Day 


आजच्या दिवशी म्हणजे 28 डिसेंबर 1875 रोजी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची (Indian National Congress) स्थापना झाली. याच दिवशी मुंबईत काँग्रेसचे पहिले अधिवेशन देखील पार पडले.
काँग्रेसच्या स्थापनेत एका माजी ब्रिटिश सनदी अधिकारी ॲलन ऑक्टेव्हिअन ह्यूम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. 


काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885  रोजी एलेन ओक्टेवियन ह्यूम, दादाभाई नौरोजी आणि दिनशॉ वाचा यांनी केली. मुंबईच्या तेजपाल संस्कृत पाठशाळेत संपूर्ण देशभरातील 72 प्रतिनिधी एकत्र येऊन 28 डिसेंबर 1885रोजी 'इंडियन नॅशनल काँग्रेस' म्हणजेच राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात आली.  


राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सरकार व जनता यांच्यामध्ये एक संवादात्मक स्वरूपाची वाटचाल सुरू झाली. काँग्रेस याचा अर्थ संघटना असा होतो. सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसचे नेतृत्व हे मवाळ गटाकडे होतं. पुढे 1906 ते 1919 पर्यंत काँग्रेसचे नेतृत्व जहाल गटाकडे होतं (लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, गोपाळ गणेश आगरकर). त्यानंतर मात्र 1920 ते 1947या काळामध्ये संपूर्ण काँग्रेसचे नेतृत्व हे महात्मा गांधींनी केलं.


1885 साली पुण्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्याचं ठरलं होतं. परंतु, पुण्यात प्लेगची साथ आल्याने काँग्रेसचं पहिलं अधिवेशन मुंबईला हलवण्यात आले. स्थापनेच्या वेळी काँग्रसचा उद्देश नमूद करण्यात आला होता. त्यानुसार सुशिक्षित भारतीयांचा सरकारमध्ये अधिक सहभाग वाढावा. भारतीय आणि ब्रिटीश सरकार यांच्यातील राजकीय संवादासाठी एक प्लॅटफॉर्म म्हणून काँग्रेसचा उपयोग व्हावा, अशी घोषणा करण्यात आली होती. 


काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बनर्जी होते. तर फिरोजशाह मेहता, सुरेन्द्रनाथ बनर्जी, रोमेश चंद्र दत्त, बद्रुद्दीन तयबजी, एस. सुब्रमण्यम अय्यर आणि इतर नेत्यांचा पहिल्या अधिवेशनात समावेश होता. यातले बहुतेक नेते हे बंगाल आणि बाँबे प्रांतातले होते. 


काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर देखील देशाच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे स्थान कायम आहे. मधल्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला अनेक स्थित्यंतरातून जावे लागले. 


1926 : हुतात्मा शिरीष कुमार यांचा जन्म  (Shirishkumar Mehta)


शिरीष कुमार यांचा जन्म  28 डिसेंबर 1926 रोजी झाला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलीदान दिले. 1942 मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटीशांविरूद्ध भारत छोडो आंदोलन सुरू केले. शिरीषकुमार नंदुरबारमध्ये सरकारविरुद्ध आंदोलन करीत होते. मंगळ बाजार परिसरात पोलिसांनी बॅरीकेड उभारले होते. जसजशी मिरवणूक गाठली त्याप्रमाणे पोलीसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज लावला. शिरीषकुमारकडे तिरंगा, भारतीय राष्ट्रध्वज होता. त्यांच्या लाठीचा आरोप मिरवणूक थांबवू शकले नाही तेव्हा पोलिसांनी गोळीबार केला. या घटनेत शिरीशकुमार हुतात्मा झाले. त्याचबरोबर धनसुखलाल वणी, घनश्याम दास, शशीधर केतकर आणि लालदास यांचाही याच जागेवर मृत्यू झाला.



1932 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचा जन्म Dhirubhai Ambani Birth Anniversary


धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी यांचा आज जन्मदिन.  व्यावसायिक हुशारीने गरिबीतूनवर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापन केला. 


1949 साली आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणाऱ्या ए. बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक 300 रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी करू लागले. ही कंपनी लहान मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. धीरूभाई त्यांचे वडीलबंधू रमणिकलाल यांच्यासह एडनमध्ये राहत. गुजराती लोकांची आवडनिवड या दोघा भावांना माहीत असल्याने त्यांनी गुजराती खाद्यपदार्थ भारतातून मागवून ते पदार्थ एडनला विकण्यास सुरू केले.आपल्या हुशारी, मेहनत, चिकाटी या गुणांच्या जोरावर धीरूभाई ए. बेस मध्ये कारकून ते सेल्स मॅनेजर या पायऱ्या ओलांडून गेले. 


1959 साली धीरूभाई यांनी 15 हजार रुपयांची गुंतवणूक करून मशीदबंदर मुंबई येथे त्र्यंबकलाल चंदरजी दामाणी (नात्याने दूरचे मामा) यांच्यासह भागीदारी करून रिलायन्स कमर्शियल कॉर्पोरेशनची स्थापना केली आणि ते मसाले (मिरी, लवंग, सुपारी, सुंठ, तमालपत्र, हळद, काजू इ.) आणि रेयॉन कापडाचा व्यवसाय करू लागले. 


1966 साली धीरूभाई अंबानी यांनी अमदावाद जवळच्या नरोडा येथे अत्याधुनिक टेक्स्टाईल मिलची सुरुवात केली. हे पाऊल त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले. 1971 साल धीरूभाईंसाठी प्रगतीचे वर्ष ठरले. भारत सरकारचे निर्यात धोरण अनुकूल होते, त्याचा फायदा उचलत धीरूभाईंनी आपले कापड रशिया, सौदी अरेबिया, पोलंड, झांबिया, युगांडा आदी देशांमध्ये निर्यात करण्यास सुरुवात केली. दर्जेदार माल आणि वाढती बाजारपेठ यामुळे धीरूभाई यशाच्या पायऱ्या चढू लागले.


1977 साली धीरूभाईंनी रिलायन्सचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. लहान लहान गुंतवणूकदारांकडून भागभांडवल पैसा गोळा करणारे धीरूभाई भारतातील पहिले उद्योगपती ठरले. त्यांच्या पहिल्याच प्रयत्‍नासाठी सुमारे 58 हजार लोकांनी आपले पैसे गुंतविले. 1978 साली धीरूभाई कापड व्यवसायात पूर्णपणे उतरले. त्यांनी विमल या नावाने कापड विक्रीस सुरुवात केली. 


1999-2000 मध्ये रिलायन्सने 25 हजार कोटींची गुंतवणूक करून जामनगर, गुजरात येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी सुरू केली. 2000 साली 25 हजार कोटींची गुंतवणूक करून इन्फोकॉम क्षेत्रातही प्रवेश केला. धीरूभाईंनी आपला दबदबा सर्वत्र निर्माण केला होता. 



1937 :  उद्योजक रतन टाटा यांचा जन्म Ratan Tata Birthday 


देशातच नव्हे तर जगभरात आपल्या कर्तृत्वाची छाप सोडणारे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योजक रतन टाटा यांचा आज जन्मदिन. टाटा समुहाचे अध्यक्ष राहिलेल्या रतन टाटा यांना पद्म विभूषण आणि पद्म भूषण सारख्या मानाच्या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र आहेत. त्यांना नवजाबाई टाटा यांनी त्यांचे पती रतनजी टाटा यांच्या निधनानंतर दत्तक घेतले होते. रतन टाटा यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमधून घेतले आणि माध्यमिक शिक्षण कॅथेड्रलमधूनच घेतले. त्यानंतर त्यांनी जॉन कॅनन कॉलेजमधून आर्किटेक्चरमध्ये बीएससी केले. त्यानंतर कॉर्नेल विद्यापीठातून 1962 मध्ये कम्युनिकेशन इंजिनीअरिंग आणि 1975 मध्ये हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमचे शिक्षण घेतले. रतन टाटा 1991 ते 2012 या काळात टाटा समूहाचे अध्यक्ष होते. 28 डिसेंबर 2012 रोजी त्यांनी टाटा समूहाचे अध्यक्षपद सोडले. 


जे. आर. डी. यांनी टाटा उद्योगसमूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. 1962च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले; मात्र समूहाच्या परंपरेनुसार 1962  ते 1971 त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच 1971 मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्‍क्‍यांवरून वीस टक्के झाला. रतन टाटा यांनी आपल्या उद्योजक कारकीर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये परदेशातील दिग्गज कंपन्यां खरेदी करण्याचा निर्णयही टाटांनी घेतला होता. 


साधेपणा, कोणताही बडेजाव नाही आणि संवेदनशीलता आदी गुणांमुळे रतन टाटा लोकप्रिय आहेत. 



इतर महत्त्वाच्या घटना :


1922 : स्पायडर मॅनचा जनक स्टॅन ली यांचा जन्म
1940 :  भारताचे माजी परराष्ट्रमंत्री आणि काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांचा जन्म 
1952 : माजी केंद्रीय मंत्री, भाजप नेते दिवंगत अरुण जेटली यांचा जन्म
1969: लिनक्स गणक यंत्रप्रणालीचा जनक लिनस तोरवाल्ड्स यांचा जन्म
2000: प्रसिद्ध तत्वचिंतक, विचारवंत, विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे यांचे निधन.
2003: कृष्णाजी सुंदरराव तथा कुशाभाऊ ठाकरे यांचे निधन.