On This Day In History : 27 फेब्रुवारीचा दिवस इतिहासात एक दुःखद घटना म्हणून नोंदला गेलाय. 27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा स्थानकातून निघालेल्या साबरमती एक्स्प्रेस ट्रेनला जमावाने आग लावली. या भीषण आगीत 59 लोकांचा मृत्यू झाला. अहमदाबादकडे जाणारी साबरमती एक्स्प्रेस नुकतीच गोध्रा स्थानकातून निघाली असताना कोणीतरी साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि त्यानंतर दगडफेक केल्यानंतर ट्रेनच्या एका डब्याला आग लागली. ट्रेनमधील लोक  अयोध्येहून परतत होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये जातीय हिंसाचार उसळला आणि मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. परिस्थिती इतकी बिघडली की तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जनतेला शांततेचे आवाहन करावे लागले. याबरोरच आजच्या दिवशी भारतीय लेखक, कवी व नाटककार कुसुमाग्रज यांची जयंती आहे. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला.



 1931 :  भारतीय थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची पुण्यतिथी 


क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मोलाचे योगदान दिले. 1921 मध्ये महात्मा गांधींनी असहकार आंदोलनाची घोषणा केली त्यावेळी चंद्रशेखर अवघे 15 वर्षांचे होते आणि ते त्या चळवळीत सामील झाले. या आंदोलनात प्रथमच चंद्रशेखरला अटक झाली. यानंतर चंद्रशेखरला पोलिस ठाण्यात नेऊन लॉकअपमध्ये बंद केले. 1922 मध्ये चौरी-चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले. त्यामुळे रामप्रसाद बिस्मिल, चंद्रशेखर आझाद आणि अशफाकुल्ला खान संतापले. त्यानंतर आझाद ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन’ संघटनेचे सक्रिय सदस्य झाले. संघटना चालवण्यासाठी आणि इंग्रजांविरुद्धच्या क्रांतीसाठी पैशांची गरज होती. त्यानंतर आझाद आणि त्यांच्या साथीदारांनी 9 ऑगस्ट 1925 रोजी काकोरी घटना घडवून सरकारी खजिना लुटला. 


या प्रकरणातील सर्व आरोपी पकडले गेले, परंतु आझादला पोलिसांनी पकडले नाही, त्यानंतर लाला लजपतराय यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली होती. चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि इतर क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवले आणि या देशभक्तांनी लालाजींच्या मृत्यूनंतर 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटीश पोलिस अधिकारी सॉंडर्स यांना गोळ्या घालून ठार मारले.


ब्रिटीश राज्याच्या हुकूमशाहीचा निषेध करण्यासाठी, जेव्हा भगतसिंग यांनी त्यांचा साथीदार बटुकेश्वर दत्त यांच्यासह 8 एप्रिल 1929 रोजी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट केला. ब्रिटिश सरकारने केलेल्या काळ्या कायद्यांना विरोध करणे हा या स्फोटाचा मुख्य उद्देश होता. आझाद यांच्या नेतृत्वाखाली हा स्फोट झाला. काकोरी घटनेत पकडलेल्या सर्व क्रांतिकारकांना शिक्षा झाली, त्यानंतर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन दीर्घकाळ निष्क्रिय होती. त्यानंतर दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर गुप्त बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये भगतसिंग यांना प्रसिद्धीची जबाबदारी देण्यात आली होती. या बैठकीत सर्व क्रांतिकारी पक्षांचे संघटन करून हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे नाव बदलून ‘हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ करण्यात आले. आझाद यांना संघटनेच्या प्रमुखाची (कमांडर-इन-चीफ) जबाबदारी देण्यात आली.


27 फेब्रुवारी 1931 रोजी चंद्रशेखर आझाद आपल्या मित्रांना भेटण्यासाठी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्कमध्ये गेले होते. यावेळी ब्रिटीश पोलिसांनी आझाद आणि त्यांच्या साथीदारांना चारही बाजूंनी घेरले आणि त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले. प्रदीर्घ गोळीबारानंतर त्यांनी आपल्या बंदुकीच्या शेवटच्या गोळी स्वतःवर झाडली. यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी जिवंत असताना इंग्रजांच्या हाती न पडण्याची शपथ घेतली होती. इंग्रजांनी कुणालाही न सांगता त्यांचे पार्थिव रसुलाबाद घाटावर पाठवून अंत्यसंस्कार केले.



1912 : भारतीय लेखक, कवी व नाटककार कुसुमाग्रज यांची जयंती


आजच्या दिवशी भारतीय लेखक, कवी व नाटककार कुसुमाग्रज यांची जयंती आहे. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi Bhasha Gaurav Din) साजरा करण्यात येतो. कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याच्या निमित्ताने 27 फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय 21 जानेवारी 2013 रोजी महाराष्ट्र सरकारने घेतला. परंतु, याच दिवसाला अनेक जण 'मराठी राजभाषा दिन' असेही म्हणतात. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 10 एप्रिल 1997 रोजी काढलेल्या परिपत्रकात 1 मे हा 'मराठी राजभाषा दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसा तो महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून 1 मे रोजी साजरा करण्यात येत होता. परंतु, कालांतराने तो विस्मृतीत गेला. त्यामुळे 1997 ला शासनाला पुन्हा परिपत्रक वाढावं लागलं.    


1953 :  ब्रिटनच्या संसदेत 'स्पेलिंग बिल'चा प्रस्ताव मांडण्यात आला


येणाऱ्या पिढ्यांसाठी इंग्रजी भाषा सुलभ व्हावी या उद्देशाने ब्रिटनच्या संसदेत 27 फेब्रुवारी 1953 रोजी 'स्पेलिंग बिल'चा प्रस्ताव मांडण्यात आला.  


1991 :  अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी पर्शियन आखाती युद्धात विजयाची घोषणा केली


अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी पर्शियन आखाती युद्धात विजयाची घोषणा करण्याबरोबरच 27 फेब्रुवारी 1991 रोजी युद्धविराम जाहीर केला. इराकने कुवेतवर आक्रमण केल्यानंतर ऑगस्ट 1990 मध्ये अमेरिकेने येथे हस्तक्षेप केला होता.


1999 :  नायजेरियामध्ये 15 वर्षांनी मतदान 


नायजेरियामध्ये 15 वर्षांत पहिला नागरी शासक निवडण्यासाठी 27 फेब्रुवारी 1999 रोजी मतदान घेण्यात आले. त्या दिवशी मोठ्या संख्येने लोकांनी मतदान केले. माजी लष्करी शासक ओलुसेगुन ओबासांजो यांनी 1979 पासून सत्ता सांभाळली होती. माजी लष्करी शासक ओलुसेगुन ओबासांजो यांनी पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षासोबत निवडणूक लढवली आणि बहुमत मिळवले. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी लष्करी राजवटीत मानवी हक्कांच्या उल्लंघनाची प्रकरणे हाती घेतली आणि राजकीय कैद्यांची तुरुंगातून सुटका केली.  


2002 : गोध्रा हत्याकांड


27 फेब्रुवारी 2002 रोजी गुजरातमधील गोध्रा स्थानकातून निघालेल्या साबरमती एक्स्प्रेस ट्रेनला उन्मादी जमावाने आग लावली. या भीषण आगीत 59 लोकांचा मृत्यू झाला. अहमदाबादकडे जाणारी साबरमती एक्स्प्रेस नुकतीच गोध्रा स्थानकातून निघाली असताना कोणीतरी साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि त्यानंतर दगडफेक केल्यानंतर ट्रेनच्या एका डब्याला आग लागली. ट्रेनमधील लोक  अयोध्येहून परतत होते. या घटनेनंतर गुजरातमध्ये जातीय हिंसाचार उसळला आणि मोठ्या प्रमाणात जीवित आणि मालमत्तेची हानी झाली. परिस्थिती इतकी बिघडली की तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना जनतेला शांततेचे आवाहन करावे लागले. 



2009 : अमेरिकेचे सैन्य इराकमधून परत बोलवण्याची घोषणा


अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑगस्ट 2010 पर्यंत सर्व सैन्य इराकमधून परत बोलवण्याची घोषणा 27 फेब्रुवारी 2009 रोजी केली. उर्वरित सैन्य 2011 च्या अखेरीस मायदेशी परतेल असे देखील त्याच दिवशी ओबामा यांनी सांगितले.


2010 : चिलीच्या किनारी भागात 8.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आणि सुनामीचा कहर  


आजच्या दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी 2010 रोजी दक्षिण अमेरिकन देश चिलीच्या किनारी भागात 8.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आणि सुनामीने कहर केला. 2010 मध्ये चिलीमध्ये 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर त्सुनामीच्या लाटा उसळल्या. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. शिवाय लाखो घरे उद्ध्वस्त झाली होती.