25th July Headline: आज दिवसभरात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. दिल्लीत संसदेचे आणि राज्यात विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गटाकडून मौन निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. तर, प्रागतिक पक्षांच्या आघाडीने आंदोलनाची हाक दिली आहे. राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. 


 
संसद अधिवेशन


मणिपूर हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी आणि पंतप्रधानांकडून उत्तराच्या मागण्यासाठी विरोधक आज पुन्हा सभागृहात आक्रमक होण्याची शक्यता आहे. सरकार सातत्याने चर्चेबाबत बोलत असले तरी, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसापासून विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मणिपूरच्या मुद्द्यावर संसदेत निवेदन करून सभागृहात चर्चा करण्याची मागणी करत आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज भाजप संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. तर, दुसरीकडे विरोधी पक्षांच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे. ज्यामध्ये आज संसदेत मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. 
 


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी


स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत याचिकेवर सुप्रीम कोर्टात मागील सुनावणीत आजची तारीख देण्यात आली होती. त्यामुळे आज तरी सुनावणी होणार का याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीशांच्या न्यायपीठासमोर प्रकरण आहे. मुंबई पुण्यासह 25 पेक्षा अधिक महापालिका जिल्हा परिषदा आणि इतर निवडणुकांचे भवितव्य या याचिकेवर अवलंबून आहे. 


 
विधिमंडळ अधिवेशन


शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती 293 अन्वेय दोन दिवस सभागृहात चर्चा झालेली आहे. यामध्ये विरोधकांनी सरकारवर अनेक आरोप प्रत्यारोप केलेले आहेत. या चर्चेला आज मुख्यमंत्री विधानसभेमध्ये उत्तर देणार आहेत. हे उत्तर देत असताना शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 



केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्यात


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मदनदास देवी यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. मदनदास देवी यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी अमित शहा आज पुण्यात येणार आहेत. देवी यांचे पार्थिव आज सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी पुण्यातील संघाचे कार्यालय मोतीबाग या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अमित शहा यांच्यासह सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, धर्मेंद्र प्रधान यासह अनेक केंद्रीय मंत्री अंत्यदर्शनासाठी येणार आहेत. 


 
मणिपूर महिला अत्याचाराविरोधात आज आंदोलन


मणिपूर महिला अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून मौन निषेध करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व फ्रंटल आणि सेलचे राज्यप्रमुख यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्राद्वारे दिली आहे. आज तालुका, जिल्हास्तरावर महात्मा गांधीजी यांच्या पुतळ्यांसमोर काळी फित बांधून या घटनेचा तीव्र निषेध केला जाणार आहे. 


मणिपूरमध्ये उसळलेली दंगल, महिलांवर होत असलेले अत्याचाराच्या विरोधात राज्यातील प्रागतिक पक्षांच्या आघाडीने 25 जुलै रोजी आंदोलनाची हाक दिली आहे. मणिपूरमध्ये मागील डीच महिन्यांत हिंसाचारात 150 बळी गेले, 60 हजार लोक बेघर झाले, पाच हजार जाळपोळी झाल्या, तरीही पंतप्रधान एक अक्षरही बोलले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर नाईलाजाने कारवाईची घोषणा केली. या सर्वच घटना अत्यंत वेदनादायक व संपूर्ण देशाला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत, असे प्रागतिक पक्षांनी म्हटले. प्रागतिक पक्षांच्या या आघाडीमध्ये राज्यातील शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्युलर) महाराष्ट्र, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, स्वाभिमानी पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटना, मार्क्सवादी कम्यनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, समाजवादी पार्टी महाराष्ट्र, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा (माले) लिबरेशन पार्टी, रिपाई (सेक्युलर) पार्टी व श्रमिक मुक्ती दल हे तेरा घटक पक्ष सहभागी आहेत. 



हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी 


राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 25 जुलैपर्यंत हसन मुश्रीफ यांना ईडीच्या अटकेपासून संरक्षण आहे. मात्र,  बदलत्या राजकीय घडामोडी पार्श्वभूमीवर, ईडीच्या वकिलांनीच कोर्टाकडे मुदतवाढ मागितली होती. आरोपांत तथ्य आणि पुरावे असल्याचे ईडीच्या वकिलांनी पुनरूच्चार केला असला तरी युक्तिवादासाठी त्यांनी वाढीव वेळ मागितला होता.



पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार; हवामान विभागाचा अंदाज


राज्यात पुढील 5 दिवसही पावसाचा जोर कायम राहणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. दरम्यान कोकण आणि विदर्भात पावसाचा जोर कायम असेल. मुंबई पुढील दोन दिवस काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्राचे रुपांतर डिप्रेशनमध्ये होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे 26 जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.


 
ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्यावर आज अंत्यसंस्कार


ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं सोमवारी दु:खद निधन झाले. त्यांच्या आज पार्थिवावर अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहेत. दुपारी 12.30 वाजता जवाहर बाग स्मशानभूमी, ठाणे (दादोजी कोंडदेव स्टेडिअमजवळ) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


 
गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणी आज निकाल


एअर होस्टेस गीतिका शर्मा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्ट आज आपला निकाल सुनावणार आहे. या प्रकरणात हरियाणाचे माजी मंत्री गोपाल गोयल कांडा हे मुख्य आरोपी आहेत. विशेष न्यायमूर्ती विकास ढल हे 20 जुलै रोजी या प्रकरणाचा निकाल देणार होते, मात्र त्यांनी या प्रकरणाची सुनावणी 25 जुलैपर्यंत पुढे ढकलली.