1st September In History: आज सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. भारतीय आयुर्विमा महामंडळाची, म्हणजेच LIC ची स्थापना आजच्या दिवशी झाली. LIC ही सरकारमान्य विमा कंपनी आहे, संकटकाळात अर्थसहाय्य पुरवते. आजच्या दिवशी जपानमध्ये महाकाय भूकंप आला होता, ज्यात जवळपास 1 लाख 43 हजार जणांना आपला जीव गमवावा लागला. आजच्या दिवशी इतरही कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या हे आजच्या दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया.


1956 : भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना


भारतीय आयुर्विमा महामंडळ ही सरकारी मालकीची सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लोक विमा आणि वित्तीय सेवा मिळवू शकतात. भारतीय आयुर्विमा महामंडळाचं इंग्रजी नाव “LIC” (भारतीय जीवन विमा निगम) आहे. एलआयसीची संपूर्ण मालकी भारत सरकारकडे आहे. या कंपनीची स्थापना 1 सप्टेंबर 1956 मध्ये झाली.


19 जून 1956 रोजी संसदेत 'एलआयसी' हा कायदा संमत झाला. त्यानंतर लगेच 1956 मध्येच विमा सेवा आणि निधी सेवा पुरवणाऱ्या सुमारे 245 भारतीय तसेच परकीय कंपन्या भारत सरकारने ताब्यात घेतल्या, त्यांचं राष्ट्रीयीकरण केलं आणि सर्व कंपन्या एकत्र करुन एलआयसीची स्थापना केली. एलआयसीचं महत्त्वाचं योगदान म्हणजे भारतीयांच्या मनात विम्याचं महत्त्व अधोरेखित करणं.


भारतीय आयुर्विमा महामंडळ आर्थिक अडचणींना तोंड देत असताना, कठीण काळात मित्र म्हणून मदत करते. आपत्तीच्या काळात आणि भविष्याची खात्री देण्यासाठी LIC रोख स्वरूपात सुविधा आणि सेवा देते. भारतीय आयुर्विमा महामंडळ जीवनादरम्यान आणि मृत्यूनंतर आर्थिक सहाय्य देते. भारतीय आयुर्विमा महामंडळाद्वारे सुरक्षित विमा ऑफर केला जातो. संरक्षित व्यक्तीचं निधन झाल्यानंतर, भारतीय आयुर्विमा महामंडळ त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करते. अपघात आणि आजारपणात देखील LIC आर्थिक सहाय्य करते. त्यामुळेच 'जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी' हे त्यांचं घोषवाक्य आहे.


देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या संस्थांपैकी अजून एक म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी आहे. ज्यामुळे मुंबईच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयुष्यात एलआयसीशी संबंध आला नसेल किंवा नाव माहिती नसेल असा माणूस विरळच असेल. कुटुंबातील एकाने तरी नक्कीच एलआयसीची पॉलिसी घेतलेली असते.


1923: जपानमधील भूकंपात 1,43,000 ठार


1 सप्टेंबर 1923 रोजी जपानच्या कांतो शहरात 7.9 तीव्रतेचा भूकंप झाला आणि संपूर्ण जपान हादरलं.जपानच्या टोक्यो आणि योकोहामा परिसरात या भूकंपाने कहर केला. या भूकंपामुळे जपानमधील पावणे चार लाखांहून अधिक घरांचं नुकसान झालं, या भूकंपाला 'ग्रेट टोक्यो अर्थक्वेक' म्हणूनही ओळखलं जातं. या भूकंपानंतर 4 मीटर उंच त्सुनामीची लाट देखील आली होता, या भूकंपात जवळपास 1 लाख 43 हजार लोकांचा मृत्यू झाला.


इतर महत्त्वाच्या घटना:


1581: शिखांचे चौथे गुरू 'गुरू रामदास' यांचं निधन.


1893: न्यायमूर्ती, कायदेपंडीत आणि समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचं निधन.


1906: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी अटॉर्नीची स्थापना झाली.


1911: पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.


1914: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचं नाव बदलून 'पेट्रोग्राड' करण्यात आलं.


1921: क्रिकेट मैदान गाजवणाऱ्या माधव मंत्री यांचा जन्म.


1926: राजस्थानी लेखक विजयदन देठा यांचा जन्म.


1949: लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांचा जन्म.


1969: लिबीयात उठाव. हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर आला.


1972: अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत केलं आणि जगज्जेता बनला.


1985: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले.


2022: अमेरिकेत सप्टेंबरमधील सर्वाधिक तापमान, ज्याची जगातील इतिहासात सर्वात जास्त तापमान म्हणून नोंद आहे. कॅलिफोर्नियामध्ये 53°C तापमानाची नोंद झाली.