19th June In History: इतिहासात प्रत्येक दिवसाचे महत्त्व आहे. आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आहेत. आजच्या दिवशी नेताजी पालकर यांना शिवाजी महाराजांनी पुन्हा हिंदू धर्मात घेतले. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेना या पक्षाची स्थापना झाली. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. 


1676:  नेताजी पालकर यांचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश


छत्रपती शिवाजी महाराज यांनी आग्रा येथून औरंगजेबाच्या कैदेतून यशस्वी सुटका केल्यानंतर औरंगजेबाने नेतोजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान 19 ऑगस्ट 1666 रोजी काढले. त्यावेळी नेताजी पालकर हे बीडजवळील मुघलांच्या छावणीत होते. २४ ऑक्टोबर १६६६ रोजी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली. त्यानंतर त्यांना आग्रा येथे पाठवण्यात आले. नेताजी पालकर यांचे मुघल सैन्याने हाल केले. त्यानंतर नेताजी पालकर हे धर्मांतरास तयार झाले. अखेर 7 मार्च 1667 रोजी नेताजी मुस्लिम झाले व त्यांचे 'मुहम्मद कुलीखान' असे नामकरण करण्यात आले. 


औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पण पुढे 9 वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते, त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. मग त्याने या 'मुहम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे 1676 रोजी पश्चात्ताप झालेले नेतोजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. 19 जून 1676 रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना संकेश्वर येथील मंदिरात पुन्हा विधिवत हिंदू धर्मामध्ये घेतले.


1966: शिवसेना पक्षाची स्थापना


महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिवसेनेचा आज स्थापना दिवस.  संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर मुंबई महाराष्ट्रात आली. पण अनेक ठिकाणी नोकऱ्यांमध्ये मराठी माणसांना डावलण्यात येत होते. मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकामधून बाळासाहेब ठाकरे यांनी वाचा फोडली. त्यानंतर पुढे 19 जून 1966 रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना करण्यात आली. समाजकारणाचा वसा घेतलेल्या शिवसेनेने राजकारणातही प्रवेश केला. 


शिवसेनेने आपल्या राजकीय प्रवासात प्रजा समाजवादी पक्ष, काँग्रेस  इंडिकेट आणि सिडिंकेट, रिपब्लिकन पक्ष (गवई गट), मुस्लीम लीग (मुंबई महापालिका निवडणूक), काँग्रेस, त्यानंतर भाजपसोबत युती केली होती. भाजपसोबतची युती ही जवळपास 25 वर्ष होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन केली होती. शिवसेनेच्या राजकीय भूमिका हे नेहमी चर्चेचा विषय ठरला. भाजपसोबत हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेने युती केली होती. शिवसेनेने राजकारणात प्रवेश केल्यानंतर कम्युनिस्ट पक्षासोबत, डाव्या संघटनांसोबत उघड संघर्ष झाले. लालबागमधील आमदार कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींचा शिवसेनेशी संबंध असल्याचे समोर आले होते. 


21 जून 2022 रोजी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षातील 40 आमदार आणि इतर  अपक्ष आमदारांसोबत बंड केले. सध्या राज्यात शिंदे गट व भाजप असे युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्रीपद शिंदे गटाकडे आणि उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष ही दोन्ही पदे भाजपकडे आहे. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 रोजी शिंदे यांचा पक्षावरील दावा मान्य करत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि नाव एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला दिले. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तर, पक्षांतर बंदी कायद्यानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांवरील अपात्रतेची कारवाई विधानसभा अध्यक्षांसमोर प्रलंबित आहे. 


1970:  राहुल गांधी यांचा जन्म


काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार राहुल गांधी यांचा आज वाढदिवस. राहुल हे नेहरू-गांधी परिवारातून आहेत. त्यांचे पणजोबा जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. कुमारवयात त्यांना सुरक्षा कारणांमुळे वारंवार शाळा बदलायला लागली. ते माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे पुत्र आहेत. 


राहुल गांधींनी त्यांचे बालपण दिल्ली आणि डेहराडूनमध्ये घालवले. बालपण आणि तरुणपण यांमधला त्यांचा बराच काळ सार्वजनिक क्षेत्रापासून दूर राहिला. त्यांनी नवी दिल्ली आणि डेहराडून येथे प्राथमिक शिक्षण घेतले परंतु सुरक्षेच्या कारणास्तव नंतर त्यांना घरीच शिक्षण देण्यात आले. हार्वर्ड विद्यापीठात जाण्यापूर्वी राहुल यांनी सेंट स्टीफन कॉलेजमध्ये पदवीपूर्व शिक्षणाची सुरुवात केली. त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सुरक्षा धोक्यांमुळे राहुल यांना फ्लोरिडा येथील रोलिन्स कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा लागला. त्यांनी 1994 मध्ये पदवी प्राप्त केली आणि पुढच्या वर्षी केंब्रिजमधून एम.फिल. पदवी मिळवली. 


राहुल गांधी यांनी 2004 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा केली आणि त्या वर्षी झालेली सार्वत्रिक निवडणूक अमेठीमधून यशस्वीपणे लढवून जिंकली. 2009 आणि 2014 मध्ये ते पुन्हा या मतदारसंघातून विजयी झाले. राहुल यांची 2013 मध्ये काँग्रेस उपाध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांनी यापूर्वी महासचिव म्हणून काम केले होते. 2014 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व केले. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. 


राहुल गांधी हे 2017 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. निवडणुकीतील खराब कामगिरीनंतर त्यांनी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. 2019 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांना अमेठी मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला. तर, केरळमधील वायनाड मतदारसंघातून ते विजयी झाले. एका प्रकरणात सूरत सत्र न्यायालयाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली. कायद्यानुसार, त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. सध्या या निकालाला कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. 


इतर महत्त्वाच्या घटना: 


1862: अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा बंद करण्यात आली.


1961: कुवेतला इंग्लंडकडून स्वातंत्र्य मिळाले.


1989: इ. एस. वेंकटरामय्या यांनी भारताचे 19 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.


1999: ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.