13 April In History: देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात 13 एप्रिलचा दिवस एका दुःखद घटनेमुळे नोंद केला गेलाय. 13 एप्रिल 1919 हा असा दिवस होता, जेव्हा अमृतसर येथिल जालियनवाला बाग येथे शांततापूर्ण मेळाव्यासाठी जमलेल्या हजारो भारतीयांवर ब्रिटीशांनी अंदाधुंद गोळीबार केला होता. बैसाखीच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे भारताचा इतिहास बदलला गेला. तसेच आजच्याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1699 रोजी शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. 


1699 : गुरु गोविंद सिंग यांनी खालसा दलाची स्थापना केली (Dal Khalsa) 


बैसाखीच्या सणाच्या दिवशी, 13 एप्रिल 1699 रोजी शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह (Guru Gobind Singh) यांनी खालसा दलाची स्थापना केली. खालसा दलाची स्थापना ही शीख धर्माच्या इतिहासातील महत्वाची घटना होती. शिखांचे नववे गुरु तेगबहादुर यांच्यानंतर श्री गुरु गोविंद सिंह हे 11 नोव्हेंबर 1675 रोजी शिखांचे दहावे गुरु म्हणून गादीवर विराजमान झाले होते. 


श्री गुरु गोविंद सिंग दररोज गुरुवाणीचे पठण करून आपल्या भक्तांना आणि अनुयायांना त्याचा सविस्तर अर्थ सांगत असत. धर्म आणि समाजाच्या संरक्षणासाठी गुरु गोविंद सिंह यांनी 1699 मध्ये खालसा दलाची स्थापना केली. खालसा पंथाच्या माध्यमातून त्यांनी जातीय भेद नष्ट करुन समानता प्रस्थापित केली. शीख बांधवामध्ये आत्म-सन्मानाची भावना वाढीस लावण्याचे महत्वपूर्ण काम श्री गुरु गोविंद सिंग यांनी केले. श्री गुरु गोविंद सिंहजी यांनी 42 वर्षे शत्रूविरुद्ध सामना केला. 1708 मध्ये त्यांनी नांदेड येथील सचखंड परिसरात आपला देह ठेवला. त्याच परिसरात सचखंड गुरुद्वारा आहे. 


1890 : दादासाहेब तोरणे यांचा जन्मदिन


मराठी चित्रपटाचे आद्य प्रवर्तक अशी ओळख असलेल्या रामचंद्र गोपाळ तोरणे उर्फ दादासाहेब तोरणे (Dadasaheb Torne) यांचा जन्म 13 एप्रिल 1890 रोजी झाला. भारतातील पहिले चलचित्र असलेल्या 'भक्त पुंडलिक'ची निर्मिती त्यांनी केली. 


1919 : जालियनवाला बाग हत्याकांड (Jallianwala Bagh) 


भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात 13 एप्रिल हा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 1919 रोजी, अमृतसरमधील जालियनवाला बाग (Jallianwala Bagh Massacre) या ठिकाणी शांततेने आंदोलन करण्यासाठी एकत्र जमलेल्या भारतीयांवर ब्रिटिश अधिकारी जनरल डायरने गोळीबार केला. या गोळीबारात शेकडो भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. 


सन 1919 साली ब्रिटिश सरकार रौलेट कायदा आणण्याच्या तयारीत होते. या कायद्यामुळे कोणत्याही भारतीयला फक्त संशयावरुन, कोणताही खटला दाखल न करता तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळणार होता. भारतीयांनी या कायद्याला कडाडून विरोध केला. पण त्याला न जुमानता 8 मार्चपासून हा कायदा लागू करण्यात आला. याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलनं, निदर्शने सुरू झाली.


रौलेट कायद्याच्या विरोधात महात्मा गांधी यांनी 6 एप्रिल रोजी देशव्यापी आंदोलन घोषित केलं. त्यावेळी अमृतसरचे लोकप्रिय नेते डॉ. सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या या अटकेचा निषेध करण्यासाठी लोकांनी आंदोलन सुरू केलं. त्याच्या विरोधात ब्रिटिशांनी पंजाबमध्ये मार्शल लॉ पुकारला आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ब्रिगेडियर जनरल डायर यांच्याकडे सोपवली.


13 एप्रिल रोजी अमृतसरमधील जालियनवाला बाग येथे रौलेट कायदा मागे घेण्यासाठी आणि नेत्यांची सुटका करण्यासाठी अमृतसरमधील हजारो लोक जालियनवाला बागेत एकत्र जमले. त्यावेळी या जमावावर जनरल डायरने अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात हजाराच्या वर लोकांना आपला जीव गमवावा लागला, अनेकांनी आपला जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणच्या विहिरीत उड्या घेतल्या. नंतर या घटनेची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशनची नियुक्ती करण्यात आली. पण हंटर कमिशनने या गोळीबारात केवळ 379 लोकांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. 


1942 : व्ही. शांताराम प्रभात फिल्म कंपनीतून बाहेर 


प्रभात कंपनीच्या संस्थापकांपैकी एक असलेले व्ही शांताराम (V Shantaram) यांनी मतभेदामुळे 13 एप्रिल 1942 रोजी प्रभात कंपनी सोडण्याचा निर्णय घेतला. शांताराम राजाराम वणकुद्रे म्हणजेच व्ही. शांताराम हे एक मराठी-हिंदी चित्रपट निर्माते, आणि दिग्दर्शक होते. प्रभातमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्माती कंपनी काढली.


1956 : अभिनेते सतीश कौशिक यांचा जन्म 


दिवंगत अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक सतीश कौशिक (Satish Kaushik) यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी झाला. मिस्टर इंडिया या चित्रपटातील "कॅलेंडर"ची भूमिका त्यांची विशेष लोकप्रिय ठरली. याशिवाय त्यांच्या तेरे नाम, जाने भी दो यारो, हम आपके दिल मे रेहते है या चित्रपटातील विनोदी भूमिका लोकप्रिय ठरल्या. 


1973 : अभिनेते बलराज साहनी यांचे निधन  


धरती के लाल, दो बिघा जमीन, गरम हवा, छोटी बहन आणि काबुलीवाला या चित्रपटातून आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या बलराज सहानी (Balraj Sahni) यांचं 13 एप्रिल 1973 रोजी निधन झालं. 


1984: भारताचे सियाचिनमध्ये ऑपरेशन मेघदूत (Operation Meghdoot) 


पाकिस्तानी सैन्य सियाचीन ग्लेशिअरवर ताबा मिळवण्यासाठी चढाई करणार असल्याची गुप्त माहिती भारतीय गुप्तचर संघटनेला (RAW) मिळाली. सियाचिन हे युद्धाच्या दृष्टीने मोक्याचं ठिकाण असून त्यावर जर पाकिस्तानने (Pakistan) ताबा मिळवला तर भारतासाठी ते धोक्याचं ठरणार होतं. त्यामुळे 13 एप्रिल 1984 रोजी भारतीय सैन्याने सियाचीनमध्ये 'ऑपरेशन मेघदूत' लॉन्च केलं. हाडं गोठवणाऱ्या थंडीत भारतीय सैन्याने जगातील या सर्वोच्च युद्धभूमीवर कब्जा मिळवला. भारताच्या दिशेला सियाचीनचा उभा चढ आहे, यामुळे ऑपरेशन मेघदूत अतिशय कठीण होतं. तर पाकिस्तानच्या बाजूची उंची फार कमी आहे. अशा परिस्थितीतही भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी सैन्यावर विजय मिळवला. त्यामुळे जगभरातील यशस्वी लढायांमध्ये 'ऑपरेशन मेघदूत'चाही समावेश होतो. हे एक वेगळंच युद्ध होतं, ज्यात भारतीय सैन्याने उणे  60 पासून उणे 70 अंश सेल्सिअस तापमानात सर्वात उंच युद्धभूमीवर जाऊन विजय मिळवला होता. तर पाकिस्तानसाठी हा लाजिरवाणा पराभव होता.


1997: टायगर वुड्सने वयाच्या 21 व्या वर्षी यूएस मास्टर्स चॅम्पियनशिप जिंकली. यासह, सर्वात कमी वयात ही स्पर्धा जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला.


2000 : अभिनेत्री लारा दत्ताने विश्वसुंदरीचा किताब पटकावला


आजचा दिवस भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा असून याच दिवशी म्हणजे 13 एप्रिल 2000 रोजी लारा दत्ता (Lara Datta) हिने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकला. त्या आधी तिने फेमिना मिस इंडियाची स्पर्धाही जिंकली होती. लारा दत्ताने नंतर अंदाज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.