Mumbai Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) थैमान घातलं आहे. मध्यरात्री मुंबईतही (Mumbai) पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह मुंबईत पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळं काही ठिकाणी झाडे पडली आहेत. तर काही ठिकाणी  घरांवरील पत्रे देखील उडून गेले आहेत.


मुंबईच्या सर्वच भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस झाला. यामध्ये अंधेरी,जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, विलेपार्ले परिसरामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. तर मरोळमध्येही जोरदार पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळं मरोळमध्ये बऱ्याच घरांचे पत्रे उडून गेले. मुंबई एअपोर्ट परिसरात देखील वादळी पाऊस झाला. 


शेती पिकांना मोठा फटका 


दरम्यान, गेल्या आठ ते दहा दिवसापासून राज्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला आहे. राज्याच्या विविध भागात हा पाऊस कोसळत आहे. याचा मोठा फटका शेती पिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झाली आहेत. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. केळी, आंबा, संत्रा, द्राक्ष या बागांचे मोठे नुकसान झालं आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच कांदा या पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. भाजीपाला पिकांचेही मोठं नुकसान झालं आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा पिकाचे नुकसान झालं आहे. काढणी केलेला कांदा या पावसामुळं जागेवरच सडत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 


आस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी नेहमीच भरडला जातो. शेतकऱ्याला यंदा कांदा पिकांमुळे येणाऱ्या पैशाची आस लागली होती. मागील नुकसानीची भर यातून निघणार होती. पुढील वर्षाचे शेतीची आर्थिक नियोजन देखील बसणार होते. मात्र निसर्गाच्या लहरीपणाचा फटका यंदाही बसल्यानं जगावं कसं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडे मदतीची मागणी होत आहे.


आज कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार 


दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार उद्या (13 एप्रिल) कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गीरपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी पुन्हा गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 आणि 15 एप्रिल दरम्यान काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Weather : मध्य महाराष्ट्रात अवकाळीचा इशारा, तर विदर्भात उन्हाचा कडाका; वाचा हवामान विभागाचा अंदाज