भंडारा : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे पडसाद विधानसभेसह संसदेतही उमटले होते.


दलित आणि सवर्णांच्या वादात दलित कुटुंबातील चार जणांची हत्या करण्यात आली होती. भैयालाल भोतमांगे यांची  पत्नी आणि तीन मुले अशा चौघांची हत्या झाली होती. शेतावर गेले असल्याने कुटुंबप्रमुख भैयालाल भोतमांगे एकटेच वाचले होते.

आरोपींना फाशी व्हावी यासाठी अनेक आंदोलनं झाली. भोतमांगेना न्याय मिळावा म्हणूण अनेक दलित संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. भैयालाल भोतमांगे यांची अजूनही न्यायासाठी लढाई सुरु आहे.

या हत्याकांडांनंतर तब्बल एक महिन्यानंतर खटला सुरु झाला होता. 15 ऑक्टोबर 2008 साली भंडारा सत्र न्यायालयाने 8 जणांना दोषी ठरवलं होतं. त्यानंतर 2010 साली नागपूर खंडपीठाने 6 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

सध्या सर्वोच्च न्यायालयात हा खटला सुरु असून आरोपींना फाशी व्हावी, अशी भैयालाल भोतमांगे यांची मागणी आहे.