Latur Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) कहर केला आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका राज्यातील शेती पिकांना बसला आहे. दरम्यान, लातूर (Latur) जिल्ह्यालाही रात्रीपासूनच तुफान अवकाळी पाऊस सुरु आहे. मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस सकाळपर्यंत सुरुच होता. या पावसानं सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या स्थितीमुळं शेतकरी संकटात सापडले आहेत.


शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडलं


मागील दोन दिवसापासून लातूर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं सातत्याने हजेरी लावली आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळं शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या पावसाबरोबरच जोरदार वारा आणि विजेचा गडगडाही सुरु होता. या वादळी वाऱ्यामुळं अनेक भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. मागील महिनाभरात अनेक वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानं शेतकऱ्याचे अर्थकारण मोडून पडलं आहे. त्यात आता पुन्हा मागील दोन ते तीन दिवसापासून सतत अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे. 


लातूर जिल्ह्यात वीज पडून 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, तर अनेक ठिकाणी जनावरांचांही मृत्यू


लातूर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी जनावरांचं मृत्यू झालं आहे. तर वीज कोसळून एका 11 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना देखील समोर आली आहे. आरुषा नथुराम राठोड (वय 11 वर्ष, रा. मुबारकपूर तांडा, ता. निलंगा) असे मृत मुलीचे नाव आहे. आरुषा नथुराम राठोड ही मुलगी शेतात शेळ्या चरण्यासाठी घेऊन गेलेली होती. मात्र, अचानक तिच्या अंगावर वीज कोसळल्यानं तिचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच निलंगा तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. 


निलंगा तालुक्यात शेती पिकांना फटका


वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळं निलंगा तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या फळबागेला फटका बसला आहे. तसेच या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने केसर आंबा, द्राक्ष आदी फळबागांचे नुकसान झाले असून प्रशासनाने नुकसान झालेल्या बागांचे तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. या पावसानं शेतकऱ्यांचे अर्थकारण मोडून पडंलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Maharashtra Rain : भंडारा जिल्ह्यासह लातूर जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस, अनेक ठिकाणची बत्ती गुल; शेती पिकांना फटका