Latur Killari Earthquake : लातूर हे नाव जरी घेतले तरी आजही आठवतो तो येथील भूकंप. 30 सप्टेंबर 1993, हाच तो काळा  दिवस. जिल्ह्यातील किल्लारी (Latur Killari Earthquake) येथे 6.4 रिश्टर स्केलचा धक्का बसला आणि काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले. 52 खेडेगावातील तीस हजारांच्या आसपास घरे आणि आधारभूत सोयीसुविधा कायमच्या नष्ट झाल्या. या धक्क्यात आठ हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले, सोळा हजारांपेक्षा जास्त लोक जखमी झाले. पंधरा हजारांपेक्षा जास्त पशुधनाचा मृत्यू झाला. या भूकंपाचा फटका लातूरच नव्हे तर राज्यातील अकरा जिल्ह्यांना बसला. अकराशे कोटी रुपयाच्या  मालमत्तेचे नुकसान झाले.  29 वर्षांपूर्वी घडलेल्या या एका घटनेने 52 गावांचा इतिहास बदलून गेला. आजही लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 गावांत भूकंपाच्या खुणा आहेत. या पडलेल्या गावांचे नवीन जागेत पुर्नवसन झाले आहे.  मात्र जुन्या गावाच्या जखमा आजही दर 30 सप्टेंबरला पुन्हा भळभळतात. 
 
अशा प्रकारे आपत्ती आल्यानंतर त्यातून बचावासाठी पहिल्यांदा आपत्ती व्यवस्थापन केले जाते. ते या भागात अनेक दिवस सुरु राहिले. राज्यातूनच नव्हे तर जगातून अनेक भागातून मदतीचा ओघ सुरु होता. ही झाली तात्पुरती मदत. मात्र या भागातील लोकांचे कायमचे पुनर्वसन करण्यासाठी प्रशासन कामाला लागले होते. अशा आपदेसाठी सरकार आर्थिक मदत देते, प्रत्यक्ष सहभाग घेत नाही. महाराष्ट्र सरकारने या भागातील आपदाग्रस्ताचे सर्वांगीन पुनर्वसन करावे हा उद्देश समोर ठेवून संपूर्ण गावे विकसित करण्याचा निर्णय घेतला.


असं सुरू झालं पुनर्वसन 


बाधित गावांची गरज लक्षात घेऊन गावासाठी जमीन संपादित करण्यापासून सुरुवात झाली. 52 गावांचे पुनर्वसन करण्याच्या या प्रकल्पावर 1200 कोटींचा खर्च होता. जागतिक बँकेची या प्रकल्पाच्या खर्चावर देखरेख होती. सरकारने लोकसहभाग प्राप्त करून हा प्रकल्प राबविणे अपेक्षित होते. पूर्ण गाव वसवणे अशा प्रकारचा देशातील हा पहिलाचा  प्रकल्प होता. यात 52 गावांचे स्थालांतर आणि पुर्नवसन, 23 हजार नवीन घरे बांधणे, विविध संस्था आणि देणगीदार यांच्या सहकार्यातून साडेपाच हजार घरे बांधून घेणे, तीस हजाराच्या आसपास घरे आहेत तेथेच बांधून देणे किंवा दुरुस्त करून देणे, त्याच प्रमाणे 13 जिल्ह्यातील अडीच हजार गावातील दोन लाखांपेक्षा जास्त घराचे दुरुस्ती करणे ही कामं हातात घेण्यात आली.


प्रत्यक्षात काम सुरु झाल्यावर सर्वात प्रथम संपादित जमिनीवर रस्ते करण्यापासून सुरुवात झाली. मुख्य रस्त्याबरोबर अंतर्गत रस्ते, नाले, पिण्याच्या पाण्याची सोय, पाईपलाईन, वीज पुरवठा, खेळाचे मैदान, शाळेची इमारत, ग्रामपंचायत, आरोग्य, वाचनालय या साथीच्या इमारती यांची आखणी आणि बांधणी करत गावातील लोकांच्या नोंदीनुसार घराचे वाटप अशा अनेक टप्प्यातून हे पुनर्वसन पार पडले आहे. मात्र ही सर्व घरे बांधताना पुन्हा भूकंप होईल अशी शक्यता लक्षात घेऊन भूकंप रोधक घरे बांधण्यात आली आहेत. 30 वर्षा नंतर ही गावे आता सुधारित सरकारी निवासस्थाने वाटतात. 


दोन घरातील अंतर, भूकंप रोधक घरे यामुळे नवीन गावाची रचना ही विरळ लोकवस्तीची झाली आहे. किल्लारी सारख्या गावाचे अंतर्गत रस्ते हे 64 किलोमीटरचे आहेत. गाव हे तीन भागात वसले आहे. यामुळे गावाचे गावपण हरवले आहे. भूकंप पीडित गावाच्या विकासासाठी शासनाने सर्वातोपरी मदत केली. गावे वसली, पीडितांना आर्थिक नुकसान भरपाई ही देण्यात आली. नोकरीत येथील मुलांना सवलत ही देण्यात आली. कोणत्याही आपत्तीला सामोरं जाणाऱ्या पीडित व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाचा शाश्वत विकास करणे आवश्यक असते. हाच उद्देश डोळ्या समोर ठेवून किल्लारी भूकंपातील बाधित गावाचा विकास करण्यात आला. तेही येथील बाजारपेठ, सामाजिक आणि आर्थिक स्तर लक्षात घेऊन गावात आम्हाला घरे मिळाली नाहीत अशी ओरड अधूनमधून  होत असते. गावातील घरे वापरण्या लायक नाहीत, पडायला आली आहेत असे ही काही लाभार्थी सांगतात तक्रार करतात. मात्र ही घरे भूकंप रोधक घरे आहेत, त्याच्या मनासारखे बांधकाम करता येत नाही हे सांगितले तरी ते आज ही अनेकांच्या लक्षात आले नाही.


आज ही गावे आर्थिकरित्या सक्षम झाली आहेत. मागील अनेक वर्षांपासून काही सरकारी मदत येते का याची वाट पहाणारे लोक गावागावात दिसत असतात. मदत मिळवून घेण्याची वृत्ती संपली आहे. शेतीला गती देण्यात आली आहे. या भागात पाण्याचे कायमच दुर्भीक्ष राहिले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी या भागातील अनेक गावात जलयुक्त शिवाराची कामे करण्यात आली आहेत तीही चक्क लोकसहभागातून. किल्लारी, मातोळा, करजगी या  गावात लोकसहभागातून कामे झाली आहेत. लोक पुढे येत आहेत.


आजही 30 वर्षा नंतर गावागावात अनेक समस्या आहेत. लांबच लांब अंतर्गत रस्ते असल्यामुळे त्याची देखभाल ग्रामपंचायत स्तरावर शक्यच नाही. तीच गत पाणीपुरवठ्याच्या पाईप लाईन आणि पाण्याच्या टाकीची आहे. लांब रस्त्यामुळे रस्त्यावर लागणाऱ्या विजेच्या दिव्यांची संख्या ग्रामपंचायत निधीत दुरुस्तीस परवडत नाही. गावाचा भौतिक विकास त्यावेळी झाला. मात्र तो तसा टिकवून ठेवण्यासाठी लागणारा पुढील निधी आता येत नाही. वाढलेली लोकसंख्या, गावाचा वाढ, प्रत्यक्षातील गरज याची त्यावेळेस तरतूद करण्यात आलीच नाही.
 
सरकारी आराखड्यानुसार जरी या गावांचे पुनर्वसन झाले तरी आपली काही जबाबदारी आहे हे सरकारने आणि प्रशासनाने लक्षात घ्यायला हवे. गावाला गावपण देण्यासाठी नागरिकांना सोबत घेऊन त्यांनी प्रयत्न करायला हवेत. कारण भूकंपानंतर नव्या भिंतींनी भेगा जरी भरल्या किंवा बुजल्या असल्या तरी जखमा मात्र आजही ओल्याच आहेत. या भरून निघणे कठीण असले तरी त्याच्यावर मायेची फुंकर घालण्याची गरज आहे. 


Sharad Pawar On Latur Earthquake : कृतज्ञता सोहळा पवारांची उपस्थिती


किल्लारी भूकंपाच्या वेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शरद पवार होते. घटनेची माहिती कळाल्यानंतर ते तात्काळ किल्लारी येथे दाखल झाले होते. 52 गावात अनेक वेळेस ते जाऊन आले आहेत. अनेक लोकांचा थेट शरद पवार यांच्याशी संपर्क आजही आहे. शरद पवार यांचे नियोजन आणि कामाच्या झपाट्यामुळे किल्लारी सह बावन गाव या धक्क्यातून सावरली होती. दरवर्षी 30 तारखेला इथे स्मृतिदिन भूकंपात बळी पडणार यांना मानवंदना दिली जाते. यावर्षी या कार्यक्रमाला शरद पवार हजेरी लावणार आहेत. याचवेळी शरद पवार यांनी केलेल्या कामाचा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी किल्लारीमध्ये पूर्ण झाली आहे.


ही बातमी वाचा: