लातूर : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका तीन मजली इमारतीला भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर येत आहे. दरम्यान अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे. मात्र, यात गुदमरून तीन लोकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर, घटनास्थळी पोलिसांच्या पथकाकडून पाहणी करण्यात येत आहे. 


लातूर शहरातील इमारतीला लागलेल्या आगीत जीवितहानी झाल्याची माहिती समोर येत आहे. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. दरम्यान, या आगीत मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान देखील झाले आहे. मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने अग्निशामक पथकाने आग आटोक्यात आणलीय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाई नावाच्या इमारतीला ही आग लागली आहे. 


तिघांचा गुदमरून मृत्यू...


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वप्रथम आग ही फुलाच्या दुकानात लागली होती. त्यानंतर आग वाढत गेली आणि शॉर्ट सर्किट झाले. आगीचे प्रमाण वाढल्याने आग आणि धुराचे लोट वाढले. या इमारतीत काही फ्लॅट ही आहेत. त्यात राहणाऱ्या लोढे परिवार आगीच्या विळख्यात सापडल्याची माहिती समोर येत आहे. यात, कुसुंबा शिवाजी लोंढे (वय 80 वर्षे), सुनील शिवाजी लोंढे (वय 58 वर्षे) प्रेमिला सुनील लोंढे (वय 50 वर्षे) यांचा आगीत गुदमरून मृत्यू झाला आहे. 


साडी बाल्कनीला बांधून मारल्या उड्या...


आग लागण्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहचले होते. आगीचा भडका अधिक असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र, मोठ्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास यश मिळाले आहे. विशेष म्हणजे याच इमारतीमध्ये काही विद्यार्थी राहत होते. मात्र, आग लागल्यावर साडी बाल्कनीला बांधून त्यांनी बाहेर उड्या मारल्या. यात चार जणांना किरकोळ मार लागला असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, तिघांचा मृत्यू झाला आहे. 


एकच धावपळ उडाली....


लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. तर, अनेकांकडून मदतीसाठी प्रयत्न करण्यात येत होते. मात्र, या इमारतीत अनेकजण अडकल्याचे समोर येताच मोठी धावपळ उडाली. इमारतीत अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत होते. यावेळी अनेक विद्यार्थी यांना बाहेर काढण्यात आले. तसेच नागरिकांना देखील बाहेर काढले गेले. पण यात तिघांचा मृत्यू झाला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Latur : काहीतरी आगतिक होतंय लक्षात आलं अन् सिलेंडरला मिठी मारली, फुगेवाल्याने स्वतःचा जीव दिला पण 12 मुलांना वाचवलं