Maharashtra Latur Crime News Updates: लातूरच (Latur News) नव्हे तर देश भर गाजलेल्या महिला काँग्रेस (Congress) पदाधिकारी हत्याकांडाचा (Kalpana Giri Murder Case) अखेर आज निकाल लागला. या हत्याकांडातील दोन मुख्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर, चार जणांना तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. साडेनऊ वर्ष चाललेल्या या प्रकरणात 126 साक्षीदार तपासण्यात आले असून एक हजार पानांपेक्षा जास्त दोषारोपपत्र आहे. 


गेल्या अनेक दिवसांपासून या हत्या प्रकरणी तारीख पे तारीख देण्यात येत होती. आज अखेर याप्रकरणी न्यायालयानं निकाल दिला. 21 मार्च 2014 रोजी एका काँग्रेसच्या पदाधिकारी यांचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा लोकांना अटक केली होती. याप्रकरणी गेल्या नऊ वर्षांपासून एक आरोपी जेलमध्ये होता, तर इतर सहाजण जामिनावर बाहेर आहेत. स्थानिक पोलीस ते सीबीआय अशा पाच तपास यंत्रणांनी या प्रकरणी तपास पूर्ण केला असून याप्रकरणी जवळपास हजार पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं होतं.


2014 च्या निवडणुकीतही काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हत्येचा मुद्दा देशभरात गाजला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात तंदूर से लातूर, असा उल्लेख केला होता. त्यानंतर या प्रकरणाची देशपातळीवर नोंद घेतली होती. आज अखेर तब्बल साडेनऊ वर्ष चाललेल्या खटल्याचा निकाल लागला. 


 


काय घडलं होतं त्या दिवशी? 


पीडित महिलेचा मृतदेह तुळजापूर जवळच्या तलावात आढळून आला होता. अपहरण आणि बलात्कारानंतर त्यांचा खून करण्यात आला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. याशिवाय त्यांच्या मृत्यूमागे युवक कॉंग्रेसचेच पदाधिकारी असल्याचंही तिच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तपासाची सूत्रं हलवली. पीडित महिलेच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी लातूरचं वातावरण चांगलंच तापलं होतं. पोलिसांनी यात महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना अटक केली होती. यापैकी महेंद्रसिंह चौहान हा युवक कॉंग्रेसचा शहर अध्यक्ष आहे, तर समीर किल्लारीकर सदस्य आहे. समीर किल्लारीकर यानं कबुली जबाब दिला आहे की, महेंद्रसिंह चौहान आणि पीडित महिला यांच्यात त्या दिवशी वाद झाला होता. महेंद्रसिंह चौहान याचं फटकून वागणं पीडित महिलेला आवडत नव्हतं. तुळजापूर जवळील तलावात ढकलून आरोपीनं त्यांचा खून केला होता. महिलेने युवक कॉंग्रेसची निवडणूक लढवू नये, असा आरोपींचा आग्रह होता. मात्र तिनं या निवडणुकीत सहभाग घेतल्यानं त्यांना युवक कॉंग्रेसचे हे पदाधिकारी जागोजागी अपमानित करत होते. युवक कॉंग्रेसवर मयत महिलेच्या वडिलांना आधीपासूनच संशय होता आणि अखेर वडिलांचा संशय खरा ठरला. 


राजकारणातली जीवघेणी चढाओढ आता युवक कार्यकर्त्यांमध्येही होताना स्पष्ट दिसत आहे. अशा परीस्थित राजकीय पक्षातील महिला युवतींची अशी दशा होत असेल, तर सर्वसाधारण महिलांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न या घटनेनं समाजाच्या मानगुटीवर कायम राहिला आहे. 


 हत्याकांडाचा घटनाक्रम 


21 मार्च 2014 रोजी महिला बेपत्ता झाली.
24 मार्चला मृतदेह धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरजवळ पाचुंदा तलावात सापडला.
24 तारखेलाच रात्री उशिरा मृतदेह लातुरात आणण्यात आला आणि लगेचंच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
26 मार्च रोजी महिलेचा भावाने बलात्कार करून खून करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
28 तारखेला संध्याकाळी पोलिसांनी हत्येप्रकरणी युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना अटक केली आहे.
13 एप्रिल रोजी या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी श्रीरंग ठाकूर याला पोलिसांनी अटक केली.
15 एप्रिल रोजी चौथा संशयित आरोपी म्हणून प्रभाकर शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली.
शेट्टीला 5 दिवसांची प्रथम पोलीस कोठडी सुनावल्यानंतर 14 दिवसांची न्यायालईन कोठडी सुनावण्यात आली होती.
त्यानंतर काही दिवसांनी या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली होती.