Latur News : लातूर-जहीराबाद या महामार्गाचे (Latur-Zaheerabad Highway) काम वेगात करण्यात आले आहे. काही दिवसात अपूर्ण कामही करण्यात येईल असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं. मात्र अनेक ठिकाणच्या अपूर्ण कामाला एक वर्ष झाल्यानंतर सुद्धा गतीच मिळत नाही. जे काम झालेलं आहे ते असून अडचण नसून खोळंबा अशासारख्या स्थितीत आहे. लातूर-जहीराबाद महामार्गावर ठिकठिकाणी रस्त्यांना मोठ्या भेगा पडल्या आहेत. हे कमी होते का काय आता अनेक ठिकाणी खड्डे ही पडले आहेत. काही ठिकाणी पुलाची अपूर्ण काम, रस्त्याची अपूर्ण कामं, पडलेल्या भेगा आणि खड्डे यामुळे अपघातांचे (Accident) प्रमाण वाढले आहे.


अर्ज, विनंती, निवेदने आणि आंदोलनही...उपयोग नाही


या सर्व प्रकाराबाबत या महामार्गाच्या दूतर्फा असलेल्या गावांनी अनेक वेळा अर्ज केले आहेत. निवेदन ही दिली आहेत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आली नाही. शेवटी आंदोलनही करण्यात आली होती, मात्र उपयोग झाला नाही


अनेक कामे अपूर्ण


मसलगा दरम्यानचा अर्धवट असलेला पूल, बाभळगाव आणि तळीखेड परिसरातील रस्ता, औराद शहाजनी येथील रस्ता अतिशय खराब झाला आहे. अवकाळी पावसाच्या (Unseasonal Rain) माऱ्यातच हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला होता. कारण पुलाचे काम अर्धवट झाले आहे. पर्यायी पुल कमी उंचीचा आहे. याचा फटका वाहतुकीला बसत आहे.


महामार्गामुळे वेग वाढला नाही मात्र जीवावर बेतले आहे


महामार्गाची निर्मिती झाल्यानंतर दोन शहर दोन राज्य ही जवळ येत असतात. कमी कालावधीमध्ये जास्त अंतर पार करता येत असते. मात्र या महामार्गाचा उपयोग करताना वाहन चालकांची तारांबळ होत आहे. अर्धवट काम रस्त्यावरील भेगा आणि खड्डे यामुळे अपघातचे प्रमाण वाढले आहे. मागील एक वर्षांमध्ये या भागामध्ये शंभरपेक्षा अधिक अपघात झाले आहेत. 50 पेक्षा अधिक लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. मसलगा, मुगाव सारख्या गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी अर्ज विनंती केल्यात मात्र काहीही उपयोग होत नाही असे मत मसलगाव येथील ग्रामस्थ तुळशीदास साळुंखे यांनी व्यक्त केलं आहे


हेही वाचा


Latur News : लातूरमधील महामार्गामध्ये येणारा महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा स्थलांतरित होणार नाही, नितीन गडकरींचं आश्वासन