कोल्हापूर : महाविकास आघाडीमध्ये अत्यंत कळीचा मुद्दा झालेल्या हातकणंगले (Hatkanangale) आणि सांगली (Sangli) लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटांमध्ये वाद-विवाद सुरू असतानाच आता आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये राजू शेट्टी यांनी पाठिंबा मागूनही ठाकरे यांनी न देता थेट उमेदवार जाहीर केला आहे. ठाकरे गटाकडून माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता हातकणंगलेची लढत चौरंगी लढत होणार आहे, तर सांगलीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील हेच राहण्याची शक्यता आहे. त्याठिकाणी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी कडाडून विरोध करूनही काँग्रेस उच्चस्तरीय नेत्यांनी आता सबुरीचा सल्ला दिल्याने जवळपास त्यांचा विरोध मावळल्यात जमा आहे. त्यामुळे वंचितनंतर आता राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी पक्ष महाविकास आघाडीपासून दूर गेले आहेत.

  


उद्धव ठाकरे काय म्हणाले?


हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतेचे उमेदवार म्हणून धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र माने यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध सुरूच आहे. इतकेच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून त्यांची उमेदवारी रद्द केली जाणार अशी सुद्धा चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून कोणती भूमिका घेतली जाणार? याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू होती. उद्धव ठाकरे यांना असलेली सहानुभूती लक्षात घेता राजू शेट्टी यांनी दोनवेळा मातोश्रीवर जाऊन भेट घेतली होती. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की राजू शेट्टी यांच्यासोबत आमची बोलणी फिस्कटली नाहीत. हातकणंगले हा शिवसेनेचा मतदार संघ आहे. 2019 मध्ये शिवसेनेचा उमेदवार याठिकाणी विजयी झाला होता. कोल्हापूरची जागा श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी सोडल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.



हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणित पाहता आम्हाला उमेदवार देण्यात यावा अशी मागणी शिवसैनिकांकडून करण्यात आली होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मात्र राजू शेट्टी यांना आम्ही पाठिंबा देऊ म्हटलं होतं. मात्र, त्यांनी मशाल चिन्हावर लढावे असा प्रस्ताव त्यांना दिला होता. दुसरी जागा सुद्धा जागा सोडल्यास शिवसैनिकांची नाराजी पाढेल याची शक्यता होती. त्यामुळे हातकणंगले आणि सांगली लढण्याचा निर्णय घेतला. 


संजय राऊत काय म्हणाले?


संजय राऊत म्हणाले की, राजू शेट्टी यांच्या कामाविषयी स्पष्ट भूमिका होती. शेतकऱ्यांबद्दल ते काम करत आहेत. 2019 मध्ये राजू शेट्टी यांचा पराभव शिवसेनेच्या उमेदवाराने केला. आम्ही पाठिंबा द्यावा, अशी राजू शेट्टी यांची भूमिका होती. मात्र,  पदाधिकाऱ्यांची भूमिका मशाल चिन्हावरच शिवसेनेचा उमेदवार असावा, अशी होती. आम्ही राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याचा प्रस्ताव दिला होता व मशाल चिन्हावर लढण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, त्यांनी विचार करून उत्तर देऊ असे सांगितले होते. त्यांनी नकार दिल्याने शाहुवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी दिली आहे. आम्ही  शेवटपर्यंत त्यांना महाविकास आघाडीतून येण्याची विनंती केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या