Rajaram Sakhar Karkhana : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह अवघ्या पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर शहरातील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी अत्यंत चुरशीने 91.12 टक्के मतदान झाले. सभासदांना मतदानासाठी घेऊन येताना दिलेल्या राजेशाही थाट तसेच साम, दाम, दंड भेदचा झालेला यथेच्छ वापर यामुळे कौल कुणाला मिळणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राजाराम कारखान्याचे कार्यक्षेत्र साडे सहा तालुक्यातील 122 गावांमध्ये आहे. 


किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता मतदान सर्वच केंद्रावर शांततेत पार पडले. मतमोजणी उद्या (25 एप्रिल) सकाळी आठ वाजल्यापासून होणार असून दुपारपर्यंत निकाल स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी विरोधी सतेज पाटील आणि सत्ताधारी महाडिक गटाकडून सर्वस्व पणाला लावून मैदानात होते. महाडिक गटाच्या ताब्यात सध्या एकमेव कारखाना असल्याने हा निकाल बरंच काही सांगून जाणारा असेल, यात शंका नाही. दोन्ही गटाकडून या निकालातून आगामी सर्व निवडणुकीची रणनीती ठरवली जाईल, हे सुद्धा नव्याने सांगण्याची गरज नाही.


सर्वाधिक चुरस संस्था गटाच्या मतदानात दिसून आली. याच गटातून सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक रिंगणात आहेत. विरोधी आघाडीकडून सचिन पाटील रिंगणात आहेत. दोन्ही गटाकडून या ठिकाणी विजयाचा दावा करण्यात आला आहे. शहरी परिसरातील सभासद वगळता साहे सहा जिल्ह्यातील सर्वच केंद्रावर मतदानासाठी कमालीचा उत्साह दिसून आला.    


मतदानाचा टक्का वाढला


राजाराम कारखान्यासाठी अत्यंत चुरशीने प्रचार झाला होता. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून राजकीय धुळवडीत अनेक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या. त्यामुळे त्याचे प्रतिबिंब मतदानातही दिसून आला. कारखान्यासाठी मतदानाचा वाढलेला टक्का कोणाला झटका आणि कोणाला दिलासा देणार? याचीही उत्सुकता आहे. राजाराम कारखान्याची मागील निवडणूक 2015 मध्ये पार पडली होती. त्यावेळी 90 टक्के मतदान झाले होते. सत्ताधारी पॅनेलने सर्व जागा जिंकल्या होत्या. 


कशी होणार मतमोजणी? 


दरम्यान, मतमोजणी उद्या मंगळवारी बावड्यातील रमणमळा परिसरातील महसूल कल्याण निधीच्या सभागृहात होईल. सकाळी आठ वाजल्यापासून दोन फेरीमध्ये 29 टेबलवर मतमोजणी होणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिले 29 आणि दुसऱ्या टप्प्यतात पुढील 30 ते 58 या केंद्रांची मतमोजणी होणार आहे. राजाराम साखर कारखान्याच्या संस्था गटातील एक व अन्य गटातील 20 अशा 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात आहेत. विरोधी आमदार सतेज पाटील परिवर्तन पॅनेलचे 29 उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने या निवडणुकीत चुरस टोकाला गेली आहे. दोन्ही बाजूंकडून वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या