Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात  (Kolhapur) जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार 21 जुलै रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 4 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश अंमलात राहील. अप्पर जिल्हा दंडाधिकारी भगवान कांबळे यांनी बंदीचे आदेश काढले आहेत. मोहरम 20 ते 29 जुलै या कालावधीत होत आहे. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरुस इत्यादी सण साजरे होणार असल्याने एखादी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होवून तसेच आक्षेपार्ह स्टेटस ठेवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) नुसार अपर जिल्हादंडाधिकारी कांबळे यांनी काढले आहेत. 


जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियातून आक्षेपार्ह स्टेटसमुळे काही घटनांमध्ये परिस्थिती चिघळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून दोन गटामध्ये तेढ निर्माण झाला होता. त्यानुसार पोलीस ठाणे अंतर्गत दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर सणांच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हा बंदी आदेश लागू करण्यात आला आहे.


जिल्ह्यात कोणत्या बाबींना बंदी असेल?


आदेशातील कलम 37 (1) नुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदूका, सुऱ्या, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे. दगड किंवा इतर शस्त्रात्रे किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन याला बंदी असेल. 


तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे. ज्यामुळे सभ्यता अथवा नितिमत्ता यास धक्का पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये राज्य उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे किंवा त्यांचा जनतेत प्रसार करणे यालाही बंदी असेल. 


दरम्यान, सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांची कर्तवे व अधिकार बजाविणे संदर्भात वरील वस्तू हाताळाव्या लागतात, तसेच एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा शांततामय मार्गाने साजरे करण्यासाठी जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादींना आदेश लागू पडणार नाही.


इतर महत्वाच्या बातम्या