कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगलाच धोबीपछाड दिला. पक्ष फोडून, तसेच चिन्ह गेल्यानंतरही शरद पवारांनी एकहाती झंझावाती यश मिळवताना दहा पैकी आठ जागा खेचून आणल्या. यानंतर या निकालावर उपरोधिक भाष्य करणारा बॅनर कोल्हापूरमध्ये झळकला होता. सुजल्यावरच कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं असा बॅनर होता. या बॅनरची देशभरात चर्चा रंगली असतानाच आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बॅनरची चर्चा रंगली आहे.


आता कशी वाजवली घंटी 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यावर केलेल्या टिप्पणीनंतर कोल्हापुरात उपरोधिक आणि खोचक भाष्य करणारा बॅनर लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे मतदार संजय मलिक यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सतेज पाटील यांना उद्देशून बंटी पाटलांची आता वाजवायची घंटी असं वक्तव्य केलं होतं. 


मात्र, आता निकालानंतर महायुतीचे उमेदवार शिंदे गटाला पाठिंबा देणारे 12 वे खासदार संजय मंडलिक यांचा काँग्रेस उमेदवार शाहू महाराज यांनी एक लाख 54 हजार मतांनी पराभूत झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी घंटी शब्दावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. आता कशी वाजवली घंटी, असा उल्लेख बॅनर्सवर लावण्यात आला आहे. यावरही भली मोठी घंटी सुद्धा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घंटीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांकडून सुद्धा प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 


सुजल्यावर कळतंय, शरद पवारांनी मारलंय कुठं!


दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत दहा जागांपैकी तब्बल आठ जागा जिंकल्याने शरद पवारांचे राज्याच्या राजकारणातील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. पक्ष फोडून बाजूला गेलेल्या अजित पवार यांना सुद्धा तगडा झटका दिला आहे. हाच धागा पकडत कोल्हापूरमध्ये लागलेल्या बॅनर्सची सुद्धा चांगली चर्चा रंगली. कोल्हापुरात स्टँड परिसरामध्ये एक बॅनर लावण्यात आला होता. त्या बॅनरवर सुजल्यावर कळतं, शरद पवारांनी मारलंय कुठं असा उपरोधिक उल्लेख करण्यात आला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या