कोल्हापूर : शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसवाले गेले नाहीत, तर भाजपने चोरून नेले आहेत. भाजप बरोबर आता कोणता पक्ष नको तर ईडी, सीबीआय आणि तपास यंत्रणा पाहिजे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे  गटाचे नेते भास्कर जाधव यांनी भाजपवर हल्ला चढवला. ते आज कोल्हापुरात बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर कडाडून हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी खेड्यापाड्यात जाऊन भाजप किती फसवं आहे हे जनतेला सांगण्याचे आदेश दिल्याचे भास्कर जाधव यांनी  सांगितले. 


सरकार हटाव आणि देश बचाव असा नारा देऊन मैदानात 


भास्कर जाधव म्हणाले की, भाजपकडून सध्या व्यक्ती प्रथम आणि नंतर देश असं चालू आहे. आधीचा भाजप आणि आताचे भाजप यांच्यात खूप फरक आहे. काँग्रेसने खूप चुका केल्या होत्या हे सांगण्यातच भाजपची पाच वर्षे गेली. नागरिकांनी त्यांना पुन्हा सत्ता दिली, पण जनतेचा भ्रमनिरास झाला. लोकांना खोटी आश्वासनं दिली आणि निर्लज्जपणा दाखवला, त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी खेड्यापाड्यात जाऊन भाजप किती फसवं आहे हे जनतेला सांगा असे आदेश दिले. सरकार हटाव आणि देश बचाव असा नारा देऊन मैदानात उतरलो आहे. 


जागावाटपावर कोणताही वाद न घालता चर्चा करू


जागावाटपावर बोलताना जाधव म्हणाले की, लोकसभेच्या 23 जागांवर पहिली चर्चा होईल उरलेल्या 25 जागांवर दुसरी चर्चा होईल. तिसरी चर्चा जागांच्या आदलाबदलावर होईल असा माझा अंदाज आहे. आम्ही तिन्ही पक्ष कोणताही वाद न घालता चर्चा करू. कोल्हापुरात दोन खासदार गेले म्हणून सेनेची ताकद कमी झाली नाही तर वाढल्याचे जाधव यांनी सांगितले. 


तेच आता उद्धव ठाकरे यांना शिवसेना शिकवत आहेत


ते पुढे म्हणाले की, अजितदादा यांच्या मांडीवर हिंदुत्व ठेवलं म्हणत होते तेच आता अजितदादा यांच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. भाजपच्या जुन्या लोकांना माहिती आहे की शिवसेनेच्या लोकांमुळे भाजप राज्यात वाढली आहे. बाळासाहेब हयात असताना दीपक केसरकर आणि उदय सामंत शिवसेनेत आले नव्हते. मात्र, तेच आता उद्धव ठाकरे यांना शिवसेना शिकवत आहेत. भास्कर जाधव कोकणातील रस्त्यांवरून बोलताना म्हणाले की, नितीन गडकरी कोकणातील रस्त्यांबाबत सांगतात जागेची समस्या आहे पण ते पूर्ण खोटं आहे. आतापर्यंत चार वेळा कोकणातल्या रस्त्यासाठी भेटलो आहे पण काही झालं नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या