कोल्हापूर : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चोकाक ते अंकली या महामार्गाच्या मोजणीबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरु आहे. महामार्गासाठी संपादित होणाऱ्या जमिनीस चौपटीप्रमाणे मोबदला न देता पोलिसबळाचा वापर करून जबरदस्तीने मोजणी केल्यास जशास तसे उत्तर देवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. 


चौपट मोबदला देवूनच जमीन संपादित करावी


भूमि अभिलेख विभागाकडून कोणतीही अद्यावत कागदपत्रे न तपासता तसेच संबधित शेतकऱ्यांना नोटीसही लागू न करता  जुन्या कागदपत्राच्या माध्यमातून मोजणी करण्याचे काम सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हद्दी निश्चीती नसून वाटणीपत्र न झाल्याने मोजणी पूर्ण होण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. सदरच्या भुसंपादनामध्ये संपादित केल्या जाणाऱ्या जमीनींना राज्य शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे दुप्पट मोबदला दिला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून रत्नागिरी ते नागपूर या 945 किलोमीटरच्या महामार्गातील जवळपास 907 किलोमीटरचे संपूर्ण भुसंपादन हे चौपटीने झालेले आहे. यामुळे याच मार्गावरील चोकाक ते अंकली हा 38 किलोमीटरच्या रस्त्यासाठी चौपट मोबदला देवूनच जमीन संपादित करावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. 


सध्या चोकाक फाटा ते अंकली येथील नवीन रस्त्याच्या चोकाक, अतिग्रे ,उदगांव या गावातील मोजणीची कार्यवाही युध्दपातळीवर सुरू आहे. यापुर्वीही शिरोली ते अंकली रस्त्याचे 2008 साली भुसंपादन होत असताना अत्यल्प दराने मोबदला दिला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या मार्गावरील अनेक शेतक-यांची संपूर्ण जमीन संपादित होणार असून त्यामुळे ते भुमिहीन होणार आहेत. 


राज्य सरकारने रत्नागिरी ते नागपूरपर्यंत जो मोबदल्याचा दर रेडीरेकनरच्या अथवा बाजारभावाच्या चौपटीने शेतकऱ्यांना दिला आहे. तोच दर या शेतकऱ्यांना दिल्यास शेतकरी भुसंपादनास कोणताही विरोध करणार नाहीत. एकाच जिल्ह्यातील  एका शेतकऱ्यास दुप्पट व एका शेतकऱ्यास चौपटीने दर देवून प्रशासनाच्या चुकीचे खापर शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. उमळवाड येथून अंकली रस्त्यापर्यंत जाणारा महामार्ग हा भरावाचा न करता पिलरचा करावा लागणार असून अन्यथा सांगली शहरासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 35 हून अधिक गावांना पुराचा फटका बसणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या